प्रतिनिधी / मिरज
शहरातील गांधी चौक ते बॉम्बे बेकरी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून नागरिक आणि मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी सदरचे काम बंद पडले.
कामाची वर्क ऑर्डर नसताना तसेच टेंडरची मुदत संपली असताना हे काम सुरू होते. केवळ खडी आणि किरकोळ स्वरूपाचा डांबर ओतून रस्ता केला जात असल्याने नागरिकांनी कामास विरोध केला. केवळ नगरसेवकांच्या समाधानासाठी आणि अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून रस्त्याचे पॅचवर्क केले जात असल्याचे ठेकेदाराने सांगितले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करावे, अशी मागणी सुधार समितीने केली. महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांनी रस्त्याचे काम चांगले करण्याची हमी दिल्यानंतर पुन्हा काम सुरू झाले.