प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील बॉम्बे बेकरी ते शिवाजी पुतळा आणि महात्मा गांधी चौक या प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरणास बुधवारी प्रारंभ झाला. आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या रस्ता कामाला प्रारंभ झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
बॉम्बे बेकरी पासून महात्मा गांधी चौक हा शहराचा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर गणेश तलाव, मंगळवार पेठेतील मिरज चर्च, शिवाजी पुतळा तेथून लक्ष्मी मार्केट चौकाला जोडणारा हा रस्ता आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत होती.
महापालिकेने जिल्हा नियोजन निधीतून शहरातील अनेक रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते रस्ते कामाचा नारळ फोडण्यात आला. यावेळी भाजपनेते सुरेश आवटी, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, मोहन व्हनखंडे, नगरसेवक संदीप आवटी, निरंजन आवटी आदी उपस्थित होते.