उपसभापती अनिल आमटवणे यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
प्रतिनिधी / मिरज
सध्या मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी, कुपनलिकांनी तळ ठोकला आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करून मिरज तालुक्याला पाणी द्यावे, अशी मागणी मिरज पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी केली आहे.
अनिल आमटवणे यांच्या नेतृत्वाखाली खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, सलगरे सरपंच तानाजी पाटील, एस.आर.पाटील, मालगावचे प्रदीप सावंत,कृष्णदेव कांबळे, अरविंद पाटील, पै. अण्णा खोत, गणेश देसाई यांनी ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना मागणीचे निवेदन दिले. 81:19 फॉर्म्युल्या प्रमाणे लाभधारक शेतकरी पाणी बिल भरण्यास तयार असून, पाणी देण्यास दिरंगाई करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.