प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील आरग येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस संतोष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांना निवेदन दिले होते.
आरगमध्ये महिन्याभरापासून पाणीटंचाई जाणवत आहे. पाझर तलाव कोरडा पडल्याने गावाची पाणीयोजना बंद आहे. ग्रामस्थांनी मंत्री पाटील यांना सांगितले की, पिण्याच्या पाण्याअभावी हाल सुरु आहेत. जनावरांनाही पाणी मिळेना झाले आहे. म्हैसाळ सिंचन योजनेतून उपसा सुरु होऊन महिना झाला, पण पैशांअभावी योजनेचे पाणी गावाला दिले जात नाही. टंचाई दूर करण्यासाठी योजनेचे पाणी पाझर तलावात सोडण्याची गरज आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी योजनेच्या अधिक्षख अभियंत्यांना पाझर तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यासाठी टंचाई निधीतून तरतुदीची सूचनाही केली.