प्रतिनिधी / सांगली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे मॅचफिक्सिंग सारखे असल्याचा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी केला. शेट्टी हे आमदार होण्यासाठी बारामतीला जातात. पण दुधाच्या दरासाठी त्यांना बारामतीला जावे वाटले नाही, असा टोला मारतानाच स्वाभिमानीच्या आंदोलनाची ‘दूधफिक्सिंग आंदोलन’ अशा शब्दात खिल्ली उडवली.
गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रूपये आणि भुकटी निर्यातीला प्रतिकिलो 50 रूपये अनुदान द्या, या मागणीसाठी सोमवारी भाजपा आणि महायुतीमधील घटकपक्षांच्या वतीने राज्यभर जिल्हाअधिकाऱयांना निवेदने देण्यात आली. हे निवेदन देण्यासाठी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या आ. खोत यांनी पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी आणि त्यांच्या आंदोलनावर टीका केली. ते म्हणाले, 21 जुलै रोजी राज्य शासनाने दूध दरासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. 16 जुलै रोजी सर्व शेतकरी संघटना आणि या क्षेत्रातील नेत्यांना शासनाची पत्रेही आली आहेत. पण ही पत्रे येताच शेट्टींनी 17 रोजी आंदोलनाची घोषणा केली. असा आरोप करतानाच शेट्टी यांचे दूध दरासाठी आंदोलनाचे नाटक जनता ओळखून असल्याची टिकाही आ. खोत यांनी केली.
वास्तविक पाहता राजू शेट्टी यांना दूध दरासाठी आंदोलन करण्याचा अधिकार नाही. ते या सरकारचा घटक पक्ष आहेत. आपल्याला आमदारकी मागायला ते बारामतीला शरद पवार यांच्याकडे गेले होते. तसे दुधाच्या दरासाठी एकवेळ जाऊन दरवाढ घेऊन आले असते तर राज्यातील शेतकऱयांनी त्यांचे अभिनंदन केले असते असाही टोला खोत यांनी मारला.
केंद्र सरकारने दुधाची भुकटी आयात केल्याने राज्यातील दुधाचे दर पडल्याचा आरोप शेट्टी करत आहेत. पण केंद्राने अद्याप कोणत्याच देशातून दूध भुकटीची आयात केली नसल्याचे आ.खोत यांनी सांगितले. महायुतीच्या सत्तेच्या काळात दूध दर आणि भुकटी निर्यातीसाठी सहाशे कोटींचे अनुदान वाटप केले होते. पण आपल्याच सहकारी दूध संघाला अनुदान मिळवायचे अशी या सरकारमधील नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे खासगी दूध संघांना अनुदान देण्यात येत नाही. सध्या राज्यात दररोज एक कोटी चाळीस लाख लीटर दुधाचे संकलन केले जाते. त्यातील 90ueeKe लिटरची भुकटी केली जाते. पण कोरोनाच्या काळात दुधाची विक्री बंद पडली आहे. शिवाय दूध भुकटीचे दरही पडले आहेत. त्यामुळे तब्बल 50 लाख दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
या शेतकऱयांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दुधाला प्रतिलिटर दहा रूपये आणि दूध भुकटी निर्यातीला 50 रूपये अनुदान मिळावे अन्यथा राज्यभर दूध बंद आंदोलन करण्याचा इशाराही आ. खोत यांनी दिला आहे.