रेल्वे गाड्यांना गर्दी, उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाची रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा टाळेबंदी होण्याची शक्यता असल्याने उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा येथील मजुर पुन्हा गावाकडे निघाले आहेत. मिरज जंक्शनवरून उत्तर भारताकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांना गर्दी होत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनलॉननंतर हजारो कामगार शहरात दाखल झाले होते. मात्र, पुन्हा लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांच्या मानगुटीवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार असल्याने मजुरांनी मूळ गावाकडे जाणे पसंत केले आहे. उत्तर भारताकडे धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना गर्दी होत आहे.