शासनाच्या निर्णयापर्यंत व्यापाऱ्यांनी धीर धरण्याचे आवाहन, विकेंड लॉकडाऊन आज संपणार
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन अथवा कठोर निर्बंधाबाबत राज्य शासन येत्या दोन दिवसांत निर्णय घेईल. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी धीर धरावा, असे आवाहन करतानाच राज्य शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयांची जिह्यात कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
कोरोनची ब्रेक द चेन साठी पुकारण्यात आलेल्या विक एण्ड लॉकडाऊनची सोमवारी सकाळी सात वाजता सांगता होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या आणि उपाययोजना, तसेच संभाव्य लॉकडाऊन यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
रस्त्यावर फिरणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर कारवाई करा
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट गंभीर होत असून कोरोना आता जीवनशैलीचा भाग बनत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व या आजाराची गंभीरता कमी करण्यासाठी सद्या असणारा लसीकरणाचा वेग चांगला असला तरी वाढला पाहिजे. याबरोबरच कोरोना बाधीत रूग्ण अनेकदा होम आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर फिरताना आढळतात. अशा रूग्णांवर कायदेशीर कारवाईचे आदेश यावेळी दिले.
रेमडेसिव्हीअरचा काळाबाजार होवू नये याबाबत दक्षता घेऊन तक्रार प्राप्त झाल्यास काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी. कोरोना बाधीत रूग्णांकडून जादा बिलाची आकारणी होवू नये, यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना सेंटरही तातडीने सुरू करावे, असे असे आदेश दिले.
लॉकडाऊन, रेमडिसिवीयर आणि बेडवरून अधिकाऱ्यांना झापले
बैठकीत लॉकडाऊनच्या कडक पालनावरून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पोलीस अधीक्षक गेडाम यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. पोलीसांचेही लक्ष नसल्याची नाराजी व्यक्त केली. तर शिराळाचे आ. मानसिंगराव नाईक यांनी शिराळयाचा एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सांगलीत तीन ठिकाणी फिरला. पण बेड न मिळाल्याने परत शिराळाला आल्याचे सांगत बेड सिस्टीमच्या नियोजबाबत नाराजी व्यक्त केली. तर आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर यांनी रेमडिसिवीयर इंजेक्शन गरीबांना मोफत देण्यासाठी तरतुद करण्याची मागणी केली. महापालिकेने कोल्हापूर रस्त्यावरील आदिसागर आणि जिल्हा क्रिडा संकूल येथील कोविड हॉस्पीटल तात्काळ सुरू करण्याची मागणी आ. पडळकर यांनी केली.
लोकप्रतिनिधींच्या माहितीसाठी व्हॅट्सअप ग्रुप
दररोज सकाळी सर्व लोकप्रतिनिधींना जिह्यातील उपलब्ध बेड संदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी. यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकाऱ्यांचा व्हॅटसअप ग्रुप करण्याचा निर्णय झाला. यावेळी ग्रामीण रूग्णालयांमध्ये अपुऱया मनुष्यबळाचा मुद्दा मांडला, यावर अशा ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन संदर्भात व्यापाऱ्यांची भावना शासनाकडे कळवली
लॉकडाऊन संदर्भातील व्यापाऱ्यांची भूमिका राज्य सरकारला कळविण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात काय तो निर्णय होईल. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी धीर धरावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. सध्या तरी जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. भविष्यात ऑक्सिजन टंचाई लक्षात घेऊन उपायोजना सुरू आहेत. या बैठकीत जिल्ह्यात 33 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल, 10 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, 11 ठिकाणी कोविड केअर सेंटर अशा 54 ठिकाणी उपचारांची सुविधा उपलब्ध असून या ठिकाणी 3 हजार 160 बेड्स आहेत. यापैकी 1 हजार 977 ऑक्सिजिनेटेड बेड्स तर 600 आयसीयु बेड्स पैकी 245 बेड्सना व्हेंटीलेटर आणि 76 बेड्सना एचएफएनओ सुविधा आहेत. जिल्ह्यात 625 लहान ऑक्सिजन सिलेंडर, 1 हजार 117 जंबो सिलेंडर, 61 ड्युरा सिलेंडर, 7 ऑक्सिजन टँक (एकूण क्षमता 48.84 के.एल.) असल्याचे सांगण्यात आले. केंद्राकडून ज्या प्रमणात लस उपलब्ध होईल त्या प्रमाणात तात्काळ लसीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाची यंत्रण अलर्ट असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
चाचण्या वाढवल्या
सद्यस्थितीत जानेवारी 2021 पासून आत्तापर्यंत 1 लाख 35 हजार 76 कोरोना नमुना चाचणी झाली असून जिह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5.53 आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर टेस्टींग सुरू असून आरटीपीसीआर चाचण्यांची संख्यांही वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अधिक सक्षम करून तालुकास्तरावरही हेल्पलाईन सुरू करावी. ग्राम दक्षता समित्या पुन्हा कार्यक्षम कराव्यात. सांगली जिल्हा लसीकरणामध्ये राज्यात अग्रेसर आहे. याबद्दल अभिनंदन करतानाच सामुहिक गर्दी होवू नये यासाठी नागरिकांनी स्वत: दक्षता घ्यावी व गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.