पुलाला धोक्यामुळे रेल्वे वाहतूक बंद
वार्ताहर / वसगडे
गेल्या दोन दिवसात झालेल्या प्रचंड पावसामुळे पलूस मिरज तालुक्याच्या सिमेवर असणारा वसगडे येथील बंधारा ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे. त्यामुळे ब्रिटिश कालीन रेल्वे पुलाला देखील धोका होण्याची शक्यता असल्याने रेल्वे वाहतूक गुरुवारी रात्री पासून बंद केली आहे.
पुणे-मिरज रेल्वे मार्गद्वारे संपूर्ण उत्तर भारत आणि मिरज ते हुबळी, हैदराबाद मार्गाने दक्षिण भारतातीला मिरज जंक्शन ला जोडणारा रेल्वे मार्ग आणि त्यावर नांद्रे आणि वसगडे गावात असणारा ब्रिटिश काळातील रेल्वे पूल अत्यंत महत्वाचा मानला जातो. मात्र गेल्या दोन दिवसात या परिसरात प्रचंड पाऊस झाला. या भागातील सर्व ओढे तलाव भरून वाहू लागले. परंतु वसगडे येथे असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्या वरील बर्गे काढून पाण्याला मार्ग दिला नाही. परिणामी बंधारा ओव्हर फलो झाला आणि वाट मिळेल तिकडे पाणी शिरायला लागले. याचा फटका काठावरील शेतकरी व रेल्वे पुलाच्या बाजूला असणाऱ्या भरावला बसला आणि मातीचा भराव निघून गेला. दिल्ली हून दक्षिणेत जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस या पुलावरून जात असल्याने धोका नको म्हणून रेल्वेने ही वाहतुक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्या रेल्वेची सांगली, मिरज, कोल्हापूर येथून दोनशे आसपास अधिकारी, कर्मचारी यांची टीम तेथे दाखल झाली असून पुलाच्या सुरक्षिततेचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाकडे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नसल्याने कामात अडचणी होत आहेत.