नुकसानीचा आकडा कोटींमध्ये, शेतकरी पुन्हा कोलमडला, पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाईची मागणी
विजांचा कडकडाट आणि सोसाटयाच्या वाऱ्यांसह बुधवारी मध्यरात्री पावसाने झोडपले,
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाचा फटका, लहरी निसर्गामुळे रोगाराईचा विळखा, औषधे किटकनाशकांचे गगनाला भिडलेले दर अशा अनंत संकटांचा सामना करुन जतन केलेल्या द्राक्षबागांना बुधवारी मध्यरात्री वादळी पावसाने जोराचा तडाखा दिला. विजांचा कडकडाट व सोसाटयाच्या वाऱयासह झालेल्या जोरदार पावसाने द्राक्षबागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई लवकरात लवकर दिली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
द्राक्षासह अन्य पिकांचेही नुकसान
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या वादळी वारे आणि पावसामुळे द्राक्षाबागांचे मंडप अनेक ठिकाणी कोसळले. तासभर झालेल्या पावसाने आंब्याचा मोहोर आणि छोटी फळे गळाली. गहू, हरभरा आणि ज्वारी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरापाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
शेतकरी हताश, प्रशासनाचे दुर्लक्ष
बुधवारी रात्रभर शेतकऱ्यांनी हताशपणे जागून काढल्या. पण प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचेच चित्र आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गुरूवारी दिवसभर प्रशासनातील कोणी अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत, त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपासून संकटांची मालिका
गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने पुरता हतबल झाला आहे. संकटांची एकामागून एक मालिका सुरू आहे. गतवर्षी अवकाळीमुळे ७५ हजार हेक्टर शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे ३८ हजार कोटींचे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या मदतीवरुन सुरु झालेला राजकीय चिखल राज्याने पाहिला. त्या भरपाईचे कवित्व अद्याप संपले नाही. तोपर्यंत बुधवारी मध्यरात्री वादळी वाऱयाचा जोरदार फटका बसला.
द्राक्षविक्री हंगाम सुरु, दर मात्र पडले
तासगाव तालुक्यातील मणेराजूरी, हातनूर, विसापूर, पेड, मांजर्डे, बोरगाव, राजापूर, सावर्डे, मांजर्डे ,येळावी हा परिसर द्राक्षबागांचे आगर मानले जाते. याशिवाय कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने दुष्काळी भागातही द्राक्षांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पण अनंत अडचणीमुळे द्राक्षबागायतदार शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे. दाक्षबागांचा एकरी खर्च वाढला आहे. सध्या द्राक्षबागा विकीचा हंगाम सुरू आहे. सुरुवातीला दर चांगला मिळाला. पण दिल्ली आंदोलन आणि अन्य कारणांमुळे दर पडले आहेत.
गतवर्षी कोरोना, यंदा अवकाळी
गतवर्षी कोरोनामुळे आलेल्या अडचणीतून अद्याप शेतकरी सावरला नसतानाच बुधवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाच्या फटकाऱ्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. मणेराजूरी येथे माजी सरपंच सुभाष जमदाडे यांची गव्हाण रोडवरील असणारी सुपर सोनाका जातीची द्राक्षबाग जोरदार वाऱ्याने मंडप तुटून कोसळली आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सावळज येथील शिवाजी तारळेकर यांची एस.एस.एन. जातीची पाऊण एकर बाग कोसळली आहे. पावसामुळे द्राक्षांचे मणी फुटले आहेत. तर अनेक ठिकाणी घड तुटून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे.
विमा कंपन्यांवर शासनाने दबाव आणावा
दरम्यान प्रशासनाने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देण्यास शासनाने दबाव आणावा अशी मागणी होत आहे. एका बाजूला दर कोसळत असतानाच अवकाळीच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.