इस्लामपूर / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नदीकाठावर दोन दिवसात महापुराने दैना उडवली असून सुमारे ३६ गावांतील हजारो लोकांचे व शेकडो जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कृष्णा नदीकाठावरील अनेक गावातील ५३८६ कुटुंबातील २४ हजार ७८२ लोकांचे तर ८०४१ इतक्या जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यातील ९० टक्यांहून अधिक लोक नातेवाईकांकडे थांबले आहेत. तर उर्वरीत इस्लामपुरातील शाळा, क्लब हाऊस, योगभवन, मंगलकार्यालय यांसह अन्य ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. तर बहुतेक जनावरांची व्यवस्थाजयंत ट्रेडिंग कंपनीने एम.आय.डी.सीमध्ये केली आहे.
अवघ्या दोन दिवसात वाळवा तालुक्यात सन २०१९ च्या महापुरासारखी अवस्था झाली. एकारात्रीत लोकांना घरे दारे सोडून बाहेर पडावे लागले. बहुतांशी लोकांनी आपल्या गावालगत सुरक्षित ठिकाणी थांबण्यास पसंती दिली. तर तेथील निवासाची व्यवस्था संपल्यानंतर प्रशासनाच्या पुढाकाराने कृष्णा काठावरील काही गावातील लोकांचे व जनावरांचे स्थलांतर इस्लामपूर येथे करण्यात आले.
प्रत्येक महापुरावेळी इस्लामपूर शहर पुरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. यावेळी ही शहराने ती परंपरा कायम ठेवली आहे. अनेक पक्ष संघटनांनी लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मदतीसाठी आघाडीवर आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, नगरसेवक खंडेराव जाधव यांचा समावेश आहे.
शहरातील जयंत पाटील खुले नाटयगृह, क्लब हाऊस, मॉडर्न हायस्कुल, परदेशी हॉल, विजया सांस्कृतिक हॉल, सिध्दनाथ हॉल, डायमंड हॉल, मुलींचे शासकीय वसतीगृह, निर्मला सांस्कृतिक हॉल याठिकाणी लोकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सन २०१९ च्या महापुरात येथील विकास व विजय राजमाने यांच्या जयंत ट्रेडिंग कंपनीने त्यांच्या एमआयडीसीमधील वर्कशॉप परिसरात जनावरांच्या निवाऱ्याची व खाद्याची सोय केली होती. यावेळी ही कंपनी जनावरांच्या सेवेसाठी धावली आहे. त्याठिकाणी सुमारे १३० जनावरांना विनामोबदला निवारा व खाद्य पुरवले जात आहे.