प्रतिनिधी / इस्लामपूर
मार्च २०२० मध्ये कोरोना संकटाने शहर हादरले. दि. २३ मार्च रोजी सर्व प्रथम शहरात रुग्ण मिळून आले. त्यामुळे इस्लामपूर हे ‘हॉटस्पॉट’ बनले होते. एक वर्ष सरत असतानाच पुन्हा शहरासह वाळवा तालुक्यात तुरळक रुग्ण सापडत आहेत. शनिवारी शहरातील पाच तर तालुक्यातील नेर्ले व वाळवा येथील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या मार्च मध्ये तालुक्यात कोरोनाचा कहर झाला. त्यापुढील चार-सहा महिने हे संकट वाढतच गेले. यामध्ये अनेक जण दगावले. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर कोरोनाने पुन्हा फेब्रुवारी पासून डोके वर काढले आहे.
दररोज तीन ते पाचच्या पटीत रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे कोव्हीशिल्ड लस देण्याचे काम सुरु असताना दुसरीकडे नव्याने रुग्ण सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे. मध्यंतरीच्या काळात लोकांनी कोरोना संबंधीत सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर या उपाययोजना सोडून दिल्या. अनेक सभा, समारंभ प्रचंड गर्दीत केले.पण पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीसांनी मास्क न वापरणारांवर कारवाई सुरु केली आहे.