पाणी योजनेचा अखंडित वीज पुरवठा न झाल्यास पुढचे आंदोलन नागरिकांना घेऊन : शिष्टमंडळाचा इशारा
प्रतिनिधी / विटा
पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. यामध्ये सुधारणा झाली नसल्याच्या आरोप करत संतप्त नगरसेवक आणि पाणी पुरवठा कार्मचाऱ्यांनी किरण तारळेकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनिल कदम आणि सहाय्यक अभियंता विशाल ग्रामोपाध्ये यांच्यासमोर धरणे धरले. कार्यकारी अभियंता कदम यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
याबाबत ज्येष्ठ नगरसेवक किरण तारळेकर यांनी यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज नगरसेवकांचे शिष्टमंडळ वीज वितरण कार्यालयावर धडकले. शिष्टमंडळामध्ये माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, दहावीर शितोळे, सुभाष भिंगारदेवे, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे, फिरोज तांबोळी, विनोद पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेंद्र चिरमे, अनिल पवार यांचेसह कर्मचारी होते.
किरण तारळेकर म्हणाले, परीसरात जलसिंचन योजनांचे पाणी आल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची आणि पर्यायाने वीजेची मागणी वाढणार आहे, हे लक्षात घेऊन अतिरीक्त पाॅवर ट्रान्सफाॅर्मर उभा करणे आवश्यक होते. ते न केल्याने घोगांव आणि आळसंद येथील पाॅवर ट्रान्सफाॅर्मर ओवरलोड होत आहेत. परिणामी ट्रिपिंग वाढुन विटा शहराचा पाणीपुरवठा वारंवार प्रभावीत होतोय. पाणी योजनेची वीज कोणत्याही ट्रिपिंगशिवाय अखंडित सुरु राहीली पाहिजे, अन्यथा शहरातील नागरिकांना बरोबर घेऊन तिव्र आंदोलन करु, असा इशारा शिष्टमंडळाने या वेळी दिला आहे. कार्यकारी अभियंता सुनिल कदम यांनी अखंडीत व ट्रिपिंगशिवाय वीजपुरवठ्याचे आश्वासन आणि पत्र दिल्यानंतर धरणे आंदोलन स्थगीत करण्यात आले.