प्रतिनिधी / विटा
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करीत विट्यासह तालुक्यात ‘ब्रेक दि चेन’ आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. नगरपालिका, पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शहरातील विविध भागात फिरून व्यवहार बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे ‘विटा लॉकडाऊन झाले काय?’ याबाबतची चर्चा जोरदार सुरू झाली होती.
खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला आहे. शहरासह तालुक्यातील रूग्णांची संख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीत शहर लॉकडाऊन करायचे काय? याबाबत प्रशासनासमोर देखिल प्रश्नचिन्ह होते. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’चे आदेश दिले. त्याला अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला ‘ब्रेक दि चेन’ आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना केल्या आहेत.
शहरात सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महसूल, नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाचे संयुक्त पथक शहरातून फिरून दुकाने बंद करण्यासाठी सुचना करू लागले. पोलिस गाडीतूनही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद करण्याच्या सुचना दिल्या जात होत्या. त्यामुळे नागरीकांत अचानक लॉकडाऊन कशासाठी? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र पथकातील कर्मचार्यांनी ब्रेक दि चेन आदेशाची अंमलबजावणी सर्वांनी काटेकोर करण्याच्या सुचना केल्या जात होत्या.
अशातच पोलिसांनी दुकाने बंद करतानाच दुकानातील कर्मचार्यांना मास्क नसल्याबाबतच्या दंडाच्या पावत्या काढण्यास सुरूवात केली. अगोदरच दुकाने बंद झाल्याने रोजगारावर गंडांतर आलेल्या कामगारांना पोलिसांच्या दंडाचा बडगा बसला. त्यामुळे कर्मचारी हवालदील झाले होते. मात्र कोरोना रोखायचा असेल, तर कडक अंमलबजावणी गरजेची असल्याने शहरातील व्यवहार अल्पावधीत बंद झाले.