विमा हप्ता भरून आठ महिने झाले तरी भरपाईचा पत्ता नाही : आंदोलन करण्याचा इशारा
प्रतिनिधी / सांगली
रब्बी हंगामात भरलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी कंपन्यांकडून विमा रक्कम अद्याप मिळाली नाही. हप्ता भरून आठ महिने होऊनही भरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
शेतकऱ्यांनी पिकाचा जुलैमध्ये विमा हप्ता भरला आहे. या विम्याची रक्कम मंजूर झाल्याची चर्चा असताना आठ महिने उलटुन गेले तरी अद्याप भरपाईची रक्कम मिळाली नाही. प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच हजारावर शेतकऱ्यांनी सुमारे दोन कोटींवर तर द्राक्ष आणि इतर पिकांसाठी दीड कोटींवर विमा हप्ता रक्कम भरली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये जिल्ह्यात वादळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. दाक्ष, डाळिंब बागासह इतर फळपीके जमिनदोस्त झाली. हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली, शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. शेतकरी उध्वस्त झाला. पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. शासनाच्या आदेशाने जिल्हाप्रशासनाने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल दिला. याच कालावधीत प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे विमा भरपाई हप्ता भरला.
मात्र अद्याप या भरपाईपोटीची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विमा मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही. मागील हंगामातील वादळी पावसानंतर पूर परिस्थिती, खराब हवामान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाले. शेतात घातलेला खर्चही निघाला नाही. त्यातच भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न गंभीर झाला आहे. अस्मानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी रब्बी हंगामातील विमा भरपाई रक्कम तत्काळ कंपन्यांनी द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
अवकाळीची भरपाई, वादळी पावसाची कधी प्रधानमंत्री फळपीक विमा रब्बी हंगाममधील डाळिंब हंगामात २०१९-२० या आर्थिक वर्षात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. हवामानावर आधारीत विमा योजनेतंर्गत 6 हजार १५९ शेतकऱ्यांना तब्बल २९कोटी ५८ लाख रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली. द्राक्ष विमा भरपाईपोटी ६ हजार ४१५ शेतकऱ्यांना ९ कोटी ९७ लाख रुपये मिळाले आहेत. संबंधित बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. जिल्ह्यात डाळींब विमा योजनेसाठी ६ हजार १९१ शेतकऱ्यांनी २ कोटी ६३ लाख ८८ हजार ६७७ रुपयांचा विमा भरला होता. जत तालुक्यातील सर्वाधिक ४ हजार ४८ शेतकऱ्यांना मदत मिळाली. माडग्याळ मंडलमध्ये १ हजार ४०१ शेतकऱ्यांना १ कोटी २१ लाख रुपये भरपाई मिळाली. आटपाडी तालुक्यातील २ हजार १० शेतकऱ्यांना ४ कोटी १७ लाख रुपये. |