लवकरच निवडीचा फैसला : काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी प्रयत्न : दोन्ही नेत्यांकडून जोरदार फिल्डिंग
प्रतिनिधी / सांगली
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसला नवचैतन्य आणण्यासाठी या चार जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करणार आहेत. सांगली जिल्हा अध्यक्षपदासाठी वसंतदादा काराखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि जतचे आ. विक्रम सावंत यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या दोघांपैकी एकाची निवड निश्चित मानली जाते. या आठवड्यात ही निवड जाहीर होणार आहे. या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद हे आ. मोहनराव कदम यांच्याकडे आहे. पण, त्यांचे वय झाल्याने आता नवीन निवडी करण्यात येणार आहेत. त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून हालचाली सुरू झाल्या आहेत. तात्काळ या निवडी होणार होत्या. पण, गेल्या महिन्याच्या शेवटी राज्यात झालेली अतिवृष्टी आणि महापूर यामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या आता या आठवड्यात करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्याच्या निवडीही करण्यात येणार आहेत. या चारही जिल्ह्याच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ असणाऱ्या इच्छुक उमदेवारांनी प्रदेश कार्यकारणीकडे चांगलीच फिल्डींग लावली आहे.
विशाल पाटील यांची जोरदार फिल्डींग
वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी जोरदार मागणी केली आहे. त्यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अग्रस्थानी असून त्या कार्यक्रमातून ते लोकसंपर्कात असतात. प्रदेश काँग्रेसच्या सर्व आंदोलनात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. विशाल पाटील यांना ही संधी मिळाल्यास अनेक वर्षानंतर दादा घराण्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा मान येणार आहे. तसेच सध्या काँग्रेसमध्ये कदम घराण्याकडे विश्वजीत कदम यांच्या रूपाने मंत्रीपद आहे. त्यामुळे आता हे अध्यक्षपद दादा घराण्याकडे येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
विक्रम सावंत यांचीही मागणी
जतचे आमदार विक्रम सावंत हे कदम घराण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्ष पद कदम गटाकडून बाहेर जावू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी स्वतःला अध्यक्षपद मिळावे. यासाठी कार्यकर्त्यांमार्फत मागणी केली आहे. विक्रम सावंतही युवानेते आहेत. तसेच ग्रामीण भागात त्यांचे नेटवर्क चांगले असल्याने त्यांनी ही जोर धरला आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची नवीन टीम तयार करण्यासाठी तालुकाअध्यक्ष, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष तसेच विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी या अध्यक्षपदासाठी कोण योग्य आहे, याची चाचपणीही केली आहे. त्यामुळे ही माळ आता कोणाच्या गळ्यात पडते ते लवकरच समजेल.