सांगली / प्रतिनिधी :
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेकडेइ कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स व स्वयंसेविकाना मानधन वाढ देण्याचा विषय १९ एप्रिल रोजी झालेल्या महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. साधारणतः १० लाख १० हजार रुपयांचा बोजा यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर पडणार होता. मात्र काहींनी या विषयपत्रात उपसूचना घालुन तब्बल २ कोटी १६ लाख ४५ हजार रुपयांचा ठराव केला आहे. यामध्ये आरसीएच कडील कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय घालण्यात आला आहे. हे बेकायदेशीर असून हा ठराव तात्काळ रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक फिरोज पठाण यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना पत्र दिले आहे. पठाण म्हणाले, यामुळे महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या मानधनात वाढ करणेचा ठराव करणेत आला आहे, त्यांची मानधनात वाढ करणेची मागणीच नाही. तसेच संबंधित विभागाकडून वाढीची मागणी असल्याची कार्यालयीन टिपण्णी नाही. मानधन वाढीसाठी पुरेशी आर्थिक तरतुद असलेबाबत मुख्य लेखाधिकाऱ्यांचा अहवाल नाही. यामुळे मनपाच्या तिजोरीवर कितीचा बोजा पडणार आहे, याबतही स्पष्टता नाही. विशेष म्हणजे आयुक्त, उपायुक्त यांचीही याला प्रशासकीय मान्यता नाही. त्यामुळे हा ठराव रद्द करावा अशी मागणी महापौर सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.