प्रतिनिधी / टोप
सांगली व कोल्हापूर जिल्हयातील नोकरदारांना दोन्ही जिल्हयामध्ये नोकरीसाठी येणे-जाणेसाठी परवानगी द्यावी अशी मागणी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सांगली जिल्हयातील बहुतांश गावामधील अनेक तरुण कोल्हापूर जिल्हयातील औद्योगिक वसाहतीमध्ये तर सांगली जिल्हयातील औद्योगिक वसाहतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील युवक नोकरीस आहेत. औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने सुरु झाले आहेत परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असल्यामुळे या तरुणांना नोकरीसाठी दोन्ही जिल्हयात येणे-जाणेस अडचण निर्माण होत आहे. २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे हे नोकरदार घरी बसून होते. त्या काळात त्यांना पगार मिळाला नसल्यामुळेत्यांच्या समोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सध्या उद्योग सुरु झाल्यामुळे या नोकरदारांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरीस जाणे गरजेचेअसल्यामुळे अशा युवकांना कोल्हापूर जिल्हयातून सांगली जिल्हयामध्ये व सांगली जिल्हयामधून कोल्हापूर जिल्हयामध्ये येणे-जाणेची परवानगी देणेसाठी योग्य ती कार्यवाही करावी अशीही मागणी खासदार माने यांनी केली आहे.
l