मोठा प्रतिसाद; पुस्तके देण्याचे आवाहन
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्याला जशी राजकारण आणि सामाजिक चळवळींची परंपरा आहे तशीच साहित्य चळवळीचीही समृध्द परंपरा आहे. या जिल्ह्यातील लेखक-कवी-साहित्यिकांनी राज्य आणि राज्याबाहेरही आपला नावलौकिक मिळवला आहे. जिल्ह्यातील अशा सार्या विचारधारांच्या, सार्या साहित्य प्रकारांमध्ये लिहीणार्या लेखकांच्या पुस्तकांचे एक समृध्द दालन सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे साकारत आहे. या उपक्रमास खुप मोठा प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात या दालनाचे उदघाटन होणार आहे.
याबाबत माहिती देताना नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्याला मोठी साहित्य परंपरा असली तरी नव्या पिढीला ती माहिती आहेच असे नाही. जिल्ह्यातील लेखकांनी लिहीलेली अनेक उत्तम पुस्तके, संदर्भ ग्रंथ, कादंबर्या, कथासंग्रह, आत्मचरित्रे, व्यक्तीचित्रे, काव्यसंग्रह, पर्यटन-कृषी-खेळ-कला याबाबतची पुस्तके वाचकांना अजूनही माहिती नाहीत किंवा ती सहजासहजी उपलब्द होत नाहीत. शिवाय जिल्ह्यातील लेखक कवींची सुचीही उपलब्द नाही. याचा विचार करुन जिल्ह्यातील साहित्यिकांच्या सहकार्याने त्यांच्या पुस्तकांसाठी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयामध्ये हक्काचे सुसज्ज दालन निर्माण करण्यात येणार आहे.
जिल्ह्याचे सुपुत्र आणि साहित्यिक ग.दि. माडगूळकर यांचे पुणे आणि शेटफळे येथे स्मारक व्हावे यासाठी आयोजित साहित्य जागरच्या निमीत्ताने जिल्ह्यातील सर्व साहित्यिक एकत्र आले होते. यावेळी झालेल्या चर्चेतून आता हे दालन उभा रहात आहे, अशी माहिती महेश कराडकर, दयासागर बन्ने यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विचारधारेतील लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत, तज्ञ, अभ्यासक, कार्यकर्ते यांची ग्रंथसंपदा आता एकाच दालनामध्ये उपलब्द होईल, असे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
काय असेल या दालनामध्ये
- सांगली जिल्ह्यात जन्मलेले पण सध्या जिल्ह्याबाहेर असलेल्या लेखकांची पुस्तके
- सांगली जिल्ह्याचा इतिहास, नामांकित व्यक्ती, घटना, प्रसंग, पर्यटन, व्यक्तिचित्रे याबाबत जिल्ह्याबाहेरील लेखकांनी लिहिलेली पुस्तके
- जिल्ह्यातील विषयांबाबतचे विशेषांक
- जिल्ह्यातील हयात नसलेल्या मान्यवर विचारवंत-अभ्यासक-लेखक-कवींची पुस्तके
- दालनामध्ये पुस्तके असलेल्या लेखकांची सुची, दालनाच्यावतीने नियमीतपणे साहित्याविषयक चर्चा व विविध उपक्रम
दालनासाठी आपली पुस्तके देण्याचे आवाहन
जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर असलेल्या जिल्ह्यातील लेखक कवींनी या दालनासाठी आपली पुस्तके यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाचे कार्यवाह नंदू गुरव, साहित्यीक दयासागर बन्ने आणि महेश कराडकर यांच्याकडे द्यावीत.