तब्बल सात महिन्यानंतर प्रवासी रेल्वे गाड्या रुळावर, रेल्वे स्टेशनवर पुन्हा लगबग
प्रतिनिधी / मिरज
तब्बल सात महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर प्रवासी रेल्वे गाड्या रविवारपासून पुन्हा रुळावर आल्या. कोल्हापूर, मिरज, सांगली, कराड, सातारा या स्टेशनवर पुन्हा लगबग पहावयास मिळाली. पहिल्याच दिवशी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस धावली. रेल्वे मार्गावरचे हिरवे-लाल कंदिल पुन्हा चमकू लागले. हिरवे-लाल झेंडे हातात घेऊन कर्मचारी स्टेशनवर गाड्यांना सिग्नल देताना दिसत होते. रेल्वे स्टेशनच्या फलाटांवर हिंदी, इंग्रजी आणि मराठीतून दिली जाणारी गाड्यांच्या आगमन-प्रस्थानांची निवेदने पुन्हा ऐकू येऊ लागली. रेल्वे इंजिनच्या शिट्टय़ा आणि भोंग्यांनी स्टेशन परिसराला पुन्हा जाग आली. तिकिट तपासणीसही प्रवाशांची तिकिटे तपासून बोगी क्रमांक दाखविताना दिसत होते.
रविवारी कोल्हापूर-मिरज-सांगली-सातारा या रेल्वे स्टेशन मार्गे महाराष्ट्र एक्सप्रेस धावली. या गाडीतून पहिल्याच दिवशी तीन जिह्यातील दोनशेहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. सर्व डबे आरक्षित असल्याने पूर्वी तिकिट आरक्षित केलेल्याच प्रवाशांना या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी होती. प्रत्येक स्टेशनबाहेर कोरोना संबंधीत सुरक्षेची साधने उपलब्ध करुन देण्यात आली होती. प्रवाशांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करुन स्टेशनवर प्रवेश दिला जात होता. रेल्वे बोगीतही सोशल डिस्टन्स पाळून प्रवाशांच्या बसण्याची सोय केली होती. प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक होते. रेल्वे गाडय़ा सुरु होणार या बातमीने स्टेशन परिसरातील लहान-मोठे दुकानदारही आनंदले होते. सहा महिन्यानंतर प्रथमच आपापली दुकाने उघडून हे दुकानदार ग्राहकांची प्रतिक्षा करताना दिसत होते. उद्यापासून कोयना एक्सप्रेसही सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर पुन्हा चैतन्य निर्माण होणार आहे.