नोव्हेंबरमध्ये पहिला गाळप : ऊसतोडणी कराराचा शुभारंभ
प्रतिनिधी / जत
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जत तालुक्यातील डफळापूर येथील श्रीपती शुगर या साखर कारखान्याचा ऊसतोडणी वाहतूक करार करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे तालुक्यात साखर कारखाना सुरू करण्याचे स्वप्न होते. कारखान्याच्या माध्यमातून
शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा व तरुणांना रोजगार मिळावा असा त्यांचा उद्देश होता. त्यानुसार आ. मोहनशेठ कदम, राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रमदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याची गतीने उभारणी सुरू आहे.
यावेळी आमदार विक्रमदादा सावंत म्हणाले की,जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे हे स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांचे स्वप्न होते. त्यानुसार शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी दोन कारखाने मंजूर केले आहेत. २५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असणाऱ्या या कारखान्याचा येत्या नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आज ऊसतोडणी वाहतूक करार केले आहेत. यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी करावी. तसेच या कारखान्यात स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे. ऊसाला चांगला दर देऊन या भागाचा विकास नक्की करू असा विश्वास आमदार सावंत यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड म्हणाले की, श्रीपती शुगर साखर कारखान्याची गतीने उभारणी होत असून ऊसतोडणी वाहतूक करार सुरू केले आहेत. ऊसाला चांगला दर देणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस नोंदणी करावी. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड, जनरल मॅनेजर महेश जोशी, शेती अधिकारी धरिगोड, इलेक्ट्रिकल मॅनेजर आनंदा कदम, राजेंद्र जेऊर व ऊस तोडणी मुकादम उपस्थित होते.