खासदार संजयकाका पाटील यांची ग्वाही : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन
सीमाबांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा
प्रतिनिधी / सांगली
सीमाबांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. हा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदाराचे शिष्टमंडळ घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याची ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
खासदार संजयकाका पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून हा प्रश्न सुटेपर्यंत हा सीमा भाग केंद्रशासित करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना हे आश्वासन दिले. खासदार संजयकाका पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव शहरचे सरचिटणीस किरण गावडे, तालुका सरचिटणीस मनोज पावसे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, माजी विरोधी पक्षनेते नेताजी जाधव, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, प्रकाशराव चव्हाण, खानापूर तालुक्याचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, शहराध्यक्ष विवेक गिरी, चिटणीस महादेव घाडी यांनी हे निवेदन दिले.
खासदार संजयकाका पाटील म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी अत्यंत योग्य आणि रास्त आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी दिल्ली दरबारी हा प्रश्न योग्य रितीने मांडण्यात आला पाहिजे. त्याठिकाणी दबाव निर्माण केला पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांची वेळ घेऊन राज्यातील सर्वपक्षीय खासदार तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन या प्रश्नाची उकल काढण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. गेल्या ६५ वर्षापासून मराठी बांधवांच्यावर मोठÎाप्रमाणात अन्याय होत आहे. हा अन्याय कोठेतरी थांबविला गेला पाहिजे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार निश्चितच एकत्रित येतील यामध्ये कोणतीही शंका नाही, हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करू या असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सीमाबांधवांची बाजू मांडताना सांगितले की, गेल्या 65 वर्षात कर्नाटकातील सरकारकडून मराठी भाषिकांच्यावर कोणकोणत्या आणि कशाप्रकारे अन्याय होत आहे. तसेच कर्नाटकातील आजपर्यंत आलेले कोणतेही सरकार बेळगाव आणि सीमाभागातून मराठी माणूस, मराठी संस्कार आणि मराठी संस्कृती कशी संपेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आताच महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्रित येवून आवाज उठविला पाहिजे त्यासाठी हा संपूर्ण सीमा भाग केंद्रशासित करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे.
किरण गावडे म्हणाले, महराष्ट्र सरकारने हा प्रश्न सोडविण्यासाठी २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण ही याचिका बोर्डावरच येवू नये यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न हाणून पाडून ही याचिका बोर्डावर येऊन त्याचे कामकाज चालू करण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. या याचिकेसाठी प्रसिध्द वकील हरिश साळवे हे बाजू मांडणार आहेत. पण ही याचिकाच अजूनपर्यंत बोर्डावर आली नाही. त्यामुळे हे कामकाज सुरू होत नाही.
मनोज पावसे म्हणाले, कर्नाटक सरकारने मराठी बांधवांच्या संस्था मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मराठी बांधवांना नोकऱ्या देणाऱ्या संस्थांच्या चौकश्या लावणे, मराठी शाळा बंद पाडणे, मराठी बांधवांची कोंडी करणे अशाप्रकारे दडपशाहीचा मार्ग अवलंबला जात आहे. त्यामुळे मराठी बांधवांच्या पाठीशी राहणाऱ्या संस्थाही आता तोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. हे सर्व थांबविण्यासाठी हा सीमाभाग केंद्रशासित होणे गरजेचे आहे. विवेक गिरी म्हणाले, गेल्या ६५ वर्षापासून हा प्रश्न सोडविण्यासाठी या भागातील मराठी बांधव प्रयत्न करत आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी आता महाराष्ट्राने पुढाकार घेण्याची गरज आहे.