जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.19 ,व्यवसाय सुरू करण्याबाबत व्यापारी आक्रमक
पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 20 वरून 7.19 टक्क्यावर आल्याने सोमवारपासून निर्बध शिथिल होण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने सोमवारपासून दुकाने उघडण्यासाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. पालकमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने जिल्ह्याचे लक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाकडे लागली आहे.
पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तरीही नियम पालन काटेकोर करण्याची आवश्यकता आहेच. दुसऱ्या लाटेतील साखळी तोडण्यासाठी तीन महिन्यापासून लॉकडाऊन आहे. पॉझिटिव्हीटी रेट दहा टक्क्याखाली आल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला निर्बंध शिथिल करण्याची सूचना काही दिवसांपूर्वी दिली होती. परंतु नियम पायदळी तुडवऱ्यामुळे दोन दिवसांत पॉझीटिव्हीटी रेट 20 ते 22 टक्क्यांच्या पुढे गेला. त्यामुळे पुन्हा निर्बंध कडक लादले.
जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी पथकांची नियुक्ती केली होती. विनामास्क, सोशल डिस्टन्स न पाळणे, विनापरवाना आणि नियमापेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक यावर कडक कारवाई सुरू केली होती. परिणामी मनपा क्षेत्राचा पॉझिटिव्हीटी रेट 6.36 तर जिल्ह्याचा रेट 7.19 पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सोमवारपासून निर्बध शिथिल होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने व्यापाऱयांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहे. जिल्ह्यासह मनपा क्षेत्राचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने सोमवारपासून सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी महापौर सुरेश पाटील, शेखर माने, राहुल पवार, चेंम्बर राष्ट्रवादीचे विराज कोकणे, चेंबर ऑफ कॉमर्सचे शरद शहा, रेडीमेड कापड असोसिएशनचे शामजीभाई पारेख, नरेंद्र चेडा, किराणा असोसिएशनचे अरूण दांडेकर, यांच्यासह सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे लक्ष
शुक्रवारी व्यापाऱयांच्या शिष्टमंडळाला पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचीही व्यापार सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागणी आहे. त्यामुळे पालकमंत्र्याच्या आदेशाकडे जिल्ह्याचे नजर आहे. सोमवारपासून व्यापाराला परवानगी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अहवाल शासनाला सादर
दरम्यान आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणमध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट दहा टक्क्यांच्या खाली आहे. शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. शासन आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी दिली.