प्रतिनिधी / सांगली
पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटिल यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने हरिपूरचा गौरव करण्यात आला. ऐतिहासिक परंपरा असणारे हरिपूरच्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा ठरला आहे. अरविंद तांबवेकर यांच्या नेतृत्वाखालील संगूदादा बोंद्रे पॅनेलच्या कामाची पोहच पावतीच यामुळे गावाला मिळाली.ग्रामस्थांमधून याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबवण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आर.आर.पाटिल यांनी ग्रामीण भागात केलेल्या कामाचा सन्मान व आबांची आठवण म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिरज तालुक्यातुन हरिपूर गावची निवड करण्यात आली. खासदार संजयकाका पाटिल व आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी विकास कामांसाठी देण्यात येत आहे.या शिवाय 14 वा वित्त आयोग तसेच इतरही शासन निधी मिळत आहे.
सांगली शहरापासून जवळच असणारे या गावात दर्जेदार सुविधा देण्यात येत आहेत. स्वच्छतेच्या बाबतीतही गावात अनेक उपक्रम राबवण्यात येतात. 2019 च्या महापूरानंतर सर्वात कमी वेळेत गावची स्वच्छता करून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला.साथीचे आजार- रोग या पासून ग्रामस्थांना सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले.
हरिपूर येथिल ऐतिहासिक संगमेश्वर मंदिराचे नूतनीकरण काम वेगात सुरू आहे.कृष्णा – वारणा संगम परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आकर्षक सुशोभीकरण, स्वच्छ परिसर, प्रसन्न वातावरण यामुळे सांगलीसह परिसरातील लोकांची मोठी वर्दळ हरिपूरमध्ये वाढत आहे.
भावे नाट्यगृह येथे आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार हरिपूरला प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार अरूण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती आशा पाटील, समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी राहूल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आदि उपस्थित होते. सरपंच विकास हणबर व सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.