व्यापारी आक्रमक, शासनाने परवानगी न दिल्यास दुकाने उघडणार
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरात दररोज केवळ ४० कोरोना रुग्ण सापडत आहेत. शहरात कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाला असतानाही व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यास सांगितले जात आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात पिचलेल्या व्यापाऱ्यांवर हा अन्याय असून, केवळ ४० रुग्णांसाठी व्यापारी आणि दोन लाख नागरिकांना वेठीस धरू नये, अशी मागणी मिरज व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. आमचा या वाढीव लॉकडाऊनला विरोध असून, शासनाने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अन्यथा नियम धुडकावून दुकाने उघडली जातील, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली होती. जेथे कोरोना नियंत्रणात आहे, तेथे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे मिरजेत कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. महापालिका वा प्रशासन विभागाच्या कोणत्याच पथकाने दुकानदारांवर कारवाई करू नये, अशी मागणीही यावेळी व्यापाऱ्यांनी केली.