फुटपाथवर दुकाने, भाजी विक्री चालतेय
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात पालिकेने लाखो रुपये खर्च करुन फुटपाथ बांधले आहे. या फुटपाथवरुन पादचारी चालण्याऐवजी किरकोळ विक्रेत्यांची दुकाने लागलेली दिसतात. ही दुकाने काही व्यापाऱयांच्या कृपेने तर काही पालिकेच्या अधिकाऱयांच्या कृपेने चाललेली आहेत. त्यामुळे सांगा नेमके फुटपाथ कोणाच्या मालकीचे आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे, अमित शिंदे यांनी केलेला आहे.
सातारा शहरात राजवाडा परिसरात मोती चौक ते देवी चौक पर्यंत फुटपाथ बांधण्यात आला आहे. तसेच बसस्थानक परिसरातही फुटपाथ आहे. राजवाडा परिसरात तर युनियन भाजी मंडई आहे. येथे फळ विक्रेत्यांना कट्टेही वाटप करण्यात आलेले आहेत. असे असताना अजिंक्य गणेश मंदिराच्या समोरच फळविक्रेत्यांचे कसेही हातगाडे लागलेले दिसतात. तोच प्रकार प्रतापसिंह हायस्कूलच्यासमोर आहे. मोती चौक ते देवी चौक या दरम्यान असलेल्या फुटपाथवर किरकोळ विक्रेते आपली दुकाने थाटून असतात. कधी कधी व्यापाऱयांची वाहने उभी असतात. त्यामुळे नेमके फुटपाथ कोणासाठी आहे?, अशी तक्रार जिल्हाधिकाऱयांकडे सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे, अमित शिंदे यांनी केली आहे.