भाजप, काँग्रेस, आप, आमदार प्रसाद गावकर सक्रिय, काँग्रेस उमेदवाराच्या शोधात, सावित्री कवळेकरांकडूनही जोर, भाजपमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे
प्रतिनिधी / सांगे
सांगे मतदारसंघाचे राजकारण आता गतीने बदलू लागले आहे. भाजप, काँग्रेस, आप, तृणमूलसह सावित्री कवळेकर व त्यांचे समर्थक सक्रिय झाले आहेत. राजकीय समीकरणे बदलत असून या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या शोधात आहे. अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्या समर्थकांची तृणमूलच्या बॅनरखाली नुकतीच बैठक घेतली असून आपमध्येही उत्साह आहे. तर भाजपचा एक गट माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या विरोधात कार्यरत आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत स्पष्टपणे मिळायला लागले आहेत.
दिवाळी सणानिमित्त इच्छुक उमेदवारांचे सांगे शहरात मोक्मयाच्या ठिकाणी पोस्टर युद्ध रंगले. 1999 पासून सतत चारवेळा भाजपने हा मतदारसंघ जिंकला. मात्र 2017 चा पराभव भाजपला जिव्हारी लागला. आताही तिकिटासाठी रस्सीखेच आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला? हा प्रश्न आहे. भाजप तिकिटासाठी माजी आमदार सुभाष फळदेसाई सक्रिय आहेत, तर दुसऱया बाजूने सावित्री कवळेकर प्रयत्न करत आहेत. त्यातच भाजप मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक व मंडळाचे इतर सात प्रमुख कार्यकर्ते यांनी श्री. फळदेसाई यांच्या विरोधात वेगळी चूल मांडली आहे. एकूणच पाहता भाजप फुटीच्या मार्गाने जात आहे. वास्तविक 2012 पासून सांगे मतदारसंघात भाजपला झालेली फुटीची लागण चालूच आहे.
काँग्रेसची स्थिती अस्पष्ट
काँग्रेसची परिस्थिती अस्पष्ट आहे. आमदार प्रसाद गावकर यांच्या नादात काँग्रेसने अभिजित देसाई यांना गमावले. आमदार गावकर यांनी तृणमूलची साथ धरली आहे, तर शिवसेनेच्या राज्य उपाध्यक्षा राखी प्रभुदेसाई नाईक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. अद्याप काँग्रेसचा उमेदवार कोण हे कळलेले नाही तसेच इच्छुकांची नावेही ऐकिवात येत नाहीत. आमदार गावकर यांनी प्रथम काँग्रेस आणि नंतर तृणमूल असा राजकीय खेळ खेळल्याने समीकरणे बदलत चालली आहेत.
सावित्री कवळेकरांसाठी वातावरणनिर्मिती
गेल्या काही दिवसांत ‘मिशन सांगे 2022’ च्या अंतर्गत 2012 पासून दुरावलेल्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांसह सांगे भाजप मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक यांच्या टीमने मतदारसंघातील अनेक भाजप कार्यकर्ते तसेच मतदारांच्या गाठीभेटी घेऊन सावित्री कवळेकर यांच्यासाठी वातावरणनिर्मिती केली आहे. हा गट सध्या सक्रिय झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही अशा पवित्र्यात हा गट आला आहे.
एकूणच परिस्थिती गंभीर आहे. सोशल मीडियावरून सांगेचे राजकारण रंगत आहे. आरोप-प्रत्यारोप, बदनामीला ऊत येत आहे. त्यातून काही निष्पन्न होण्यापेक्षा वातावरण दूषित होत आहे. काही राजकारण्यांनी दिवाळीचे औचित्य साधून मतदारांना फराळ व पोहे यांची भेट दिली आहे. आपमध्येही बंडखोरी होऊ शकते. पण आप सांगेत नवीन असल्याने ते त्यावर मात करू शकतात. विरोधकांची युती होते की नाही हे कळत नाही. वाढत्या महागाईमुळे मतदार नाराज आहेत. खाणी सुरू होत नाहीत ही चिंता येथील मतदारांना सतावत आहे.