समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी/ सांगे
नुने-नेत्रावळी, सांगे येथील शेतकरी कष्टकरी असून शेती, काजू व अन्य बागायती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. यापुढे बंधाऱयाची बांधणी झाल्यानंतर खरीपबरोबरच रब्बी पिके घेण्यासही मदत होणार आहे. या बंधाऱयामुळे सभोवतालच्या भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. सांगे भागातून येणाऱया काळात 300 नवीन शेतकरी शेती व्यवसायात उतरावेत असे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तरुणांनी शेतीत उतरले पाहिजे. सरकार त्यासाठी सर्व मदत करायला तयार आहे, असे सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी नुने, नेत्रावळी येथे सांगितले.
जलस्रोत खात्याच्या अंतर्गत नुने येथे बांधण्यात येणाऱया बंधाऱयाची पायाभरणी फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आली. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी गेल्या तीन महिन्यांत पाच वेळा सांगे मतदारसंघात भेटी देऊन शेतकऱयांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. जे काही कामांचे प्रस्ताव आहेत ते पाठवा, निधी पुरवू, असे त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.
नुने येथील शेतकऱयांनी बंधाऱयाचा फायदा घेऊन शेतीचे पीक वाढवावे. भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीत शेतकऱयांनी पुढे यावे, असे सांगताना फळदेसाई यांनी, प्रत्येक 2 ते 3 किलोमीटर अंतरावर बंधारा बांधण्याची गरज व्यक्त केली. मोठय़ा प्रमाणात काकडी आणि मिरचीचे उत्पादन घ्यावे, असेही ते म्हणाले.
सरपंच बुंदो वरक म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत विकास ठप्प झाला होता. आता फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती प्राप्त झालेली आहे. रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा प्रारंभ झाल्याचे उदाहरण ताजे असताना बंधाऱयाची पायाभरणी झाली आहे. या बंधाऱयाचा नुने येथील शेतकऱयांना फायदा होणार आहे. फळदेसाई यांच्याबरोबर काम करण्यास उमेद येते, असे उद्गार वरक यांनी काढले. यावेळी पंच राखी प्रभुदेसाई, उपसरपंच फ्रान्सिस मास्कारेन्हस, पंच गावकर, माजी सरपंच शशिकांत गावकर, पंच रजनी गावकर, गावचे गावकर, कंत्राटदार इत्यादी हजर होते.