तृणमूलच्या खासदार सुश्मिता देव यांची माजी आमदार सुभाष फळदेसाई, प्रसाद गावकर यांच्यावर टीका
प्रतिनिधी /सांगे
माजी आमदार प्रसाद गावकर व सुभाष फळदेसाई यांनी आपापल्या कारकिर्दीत केवळ कोटय़वधी रुपये खर्च करून जलवाहिन्या टाकल्या, पण जनतेला पाणी दिले नाही. तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यास प्रत्येक घराला पाणी देण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती राज्यसभा खासदार सुश्मिता देव यांनी सांगे येथील गुरुकुल सभागृहात तृणमूल काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात भाजपला जनता कंटाळली असून तृणमूल काँग्रेस हा भक्कम पर्याय निर्माण झाला आहे. गोव्यात सगळय़ांना बरोबर घेऊन आम्ही चालणार आहोत. गोव्यातील जनतेचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. आम्ही गोव्यात तीन सर्वेक्षणे केली. त्यातून गोव्यातील जनता भाजप सरकारवर नाराज असल्याचे दिसून आले, असे देव यांनी सांगितले. सांगेतील जनतेला पिण्याचे पाणी देण्यासाठी माजी आमदार प्रसाद गावकर यांनी एक जलवाहिनी घातली. त्यापूर्वी माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी एक जलवाहिनी घातली. पण लोकांना नीट पाण्याची सोय झाली नाही. जनतेचा पैसा वाया गेला. तृणमूलचे सरकार सत्तेवर आल्यास याची चौकशी केली जाईल, असे देव यांनी पुढे सांगितले.
आज भाजप तृणमूलला बाहेरची पार्टी म्हणतो, तर मग भाजप तरी स्थानिक पार्टी आहे का, असा सवाल त्यांनी केला. एकेकाळी भाजपही बाहेरचा पक्ष होता याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी राखी प्रभुदेसाई नाईक, आर्याकुमार जांबावलीकर, वाडेचे सरपंच दामासियो बार्रेटो, कांता गावडे, आनंद वेळीप, दामोदर वेळीप व इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना देव म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबविलेली डिजिटल इंडिया, नोटबंदी यांचे तीन तेरा वाजले आहेत. अजूनही ग्रामीण भागांतील जनतेला नेटवर्क मिळत नाही. सांगे मतदारसंघातील चार पंचायतींत अजूनही नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संजीवनीच्या जमिनीत विश्वविद्यालय नको
संजीवनी साखर कारखान्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, संजीवनी साखर कारखान्याकडे असलेल्या दहा लाख चौरस मीटर जमिनीत विश्वविद्यालय बांधण्याची तयारी सरकारने चालवली आहे. तृणमूल काँग्रेस विश्वविद्यालयाच्या विरोधात नाही. सरकारने ते जरूर बांधावे, पण ते शेतकऱयांच्या पोटावर पाय ठेवून संजीवनी साखर कारखान्याच्या जमिनीत नव्हे, तर इतरत्र कुठे तरी बांधावे, असे देव यांनी सूचविले.
धरणग्रस्तांच्या सर्व समस्या सोडवू
साळावली धरणासाठी नागरिकांना जमिनी सोडाव्या लागल्या. धरणग्रस्तांना अजूनही मालकी हक्क मिळालेला नाही, तर काहींना अजूनही जमिनी मिळालेल्या नाहीत. तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यावर धरणग्रस्तांच्या सर्व समस्या उच्चस्तरीय समिती स्थापन करून ठरावीक वेळेत सोडविल्या जातील. यापूर्वीच तृणमूलने 1976 पूर्वीच्या जमिनी लोकांच्या नावावर करून देण्याचे आश्वासन दिले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तृणमूलविषयी अपप्रचार
तृणमूलविषयी खोटारडा प्रचार केला जात आहे. पश्चिम बंगाल म्हणजे मिनी इंडिया आहे. सर्व राज्यांतील लोकं तेथे राहतात. तीन वेळा तेथील जनतेने ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री बनविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची जादू तेथे चालली नाही. एकतेचे धडे भाजपने आम्हाला देऊ नयेत, असे त्यांनी सांगितले. लवकरच राज्य निवडणूक समितीची स्थापना करून उमेदवार निश्चित केले जातील, असे देव म्हणाल्या.
राखी नाईक म्हणाल्या की, गेली 20 वर्षे सांगेचा विकास खुंटला आहे. गोव्यातील जनता काँग्रेस व भाजप राजवटीला कंटाळली आहे. तृणमूल काँग्रेस हा एकमेव पर्याय राहिला आहे. भाजप राजवटीत लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. सांगे मतदारसंघात तृणमूलला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, असा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेच्या पूर्वी सुश्मिता देव यांनी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत श्री पाईकदेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर देव यांनी रिवण व नेत्रावळी येथे आयोजित बैठकांत समर्थकांना मार्गदर्शन केले.