प्रसाद तिळवे/ सांगे
सांगे हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा मतदारसंघ असून सध्या येथे राजकीय माहोल रंगतदार झाला आहे. यंदा अटीतटीच्या लढतीची अपेक्षा आहे. सध्य आप व आरजीने आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यातच गत निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी आमदार प्रसाद गावकर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळेल हे आता नक्की झाले आहे. भाजप उमेदवारीसाठी माजी आमदार सुभाष फळदेसाई आणि राज्य भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा सावित्री कवळेकर हे दोन्ही प्रबळ दावेदार असल्याने उमेदवारी कोणाला हा प्रश्न आहे. मगो-तृणमूल युती असून राखी प्रभुदेसाई नाईक यांनी काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर जोर लावलेला आहे. एकूणच पंचरंगी लढतीचे स्पष्ट संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.
सांगे मतदारसंघात सांगे हे लहान शहर वगळता इतर सर्व भाग ग्रामीण. सांगे पालिका आणि सात ग्रामपंचायतींचे क्षेत्र मिळून मतदारसंघ बनलेला आहे. एकेकाळी मगो पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात 1999 साली भाजपाने सुरूंग लावला. या निवडणुकीत भाजप हा मतदारसंघ काबिज करू पाहत आहे. मात्र बंडखोरी रोखायची कशी ही डोकेदुखी आहे. भाजपने सुभाष फळदेसाई यांना उमेदवारी दिली, तर बंडखोरी अटळ आहे. सावित्री कवळेकर यांनी यापूर्वीच आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे. यापूर्वी त्यांनी सांगे बसस्थानकावर जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शन घडवून आणले आहे. त्यामुळे पक्ष कोणाला तिकीट देणार याविषयी उत्सुकता आहे.
काँग्रेसची मदार प्रसाद गावकरवर
एकूणच भाजपाला ग्रहण लागल्याचे दिसून येते. एरव्ही भाजपाच्या दृष्टीने हा सुरक्षित मतदारसंघ आहे. मात्र एकच अडचण आहे आणि ती म्हणजे उमेदवारीची. भाजप यावर कसा मात करतो ते पाहावे लागेल. 2017 च्या निवडणुकीत सांगेच्या इतिहासात प्रथमच जनसेने अपक्ष उमेदवार निवडून दिला. प्रथम काँग्रेस, त्यानंतर तृणमूल अशी सर्कस करत अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला विरोध करणाऱया काही स्थानिक काँग्रेसवाल्यांचा विरोध आता थंड झाला आहे. काँग्रेस ही चांगली खेळी खेळली आहे. प्रसाद गावकर हे एसटी समाजाचे असल्याने त्यांच्याकडे असलेली स्वतंत्र मते आणि काँग्रेसची मते या आधारावर 1994 नंतर 23 वर्षांनी सांगेत ते काँग्रेसचा झेंडा फडकवतील अशी आशा पक्षश्रेष्ठींना वाटते.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडे प्रसाद गावकर यांचे जवळचे संबंध आहेत. सांगेतील काँगेसच्या राजकारणात कामत यांनी धूर्त खेळी केलेली आहे. गावकर यांच्या प्रवेशानंतर विरोधकांचा आवाजही बंद झाला आहे. दुसरीकडे, गावकर यांच्या काळात विकासकामे ठप्प झाल्याचा ठपका विरोधक त्यांच्यावर ठेवतात. मात्र गेल्या निवडणुकीत गावकर यांच्याबरोबर असलेले काही कार्यकर्ते व समर्थक त्यांच्याबरोबर नाहीत हे सत्य आहे. गेल्या वेळी त्यांना अपक्ष उमेदवारी कामी आली. पण आता काँग्रेस उमेदवार या नात्याने वाटचाल कशी असेल हे काही दिवसांत कळणार आहे.
आपतर्फे अभिजित देसाईंकडून जोर
काँग्रेसने अभिजित देसाई यांना गमावले असले, तरी त्यांनी आपमध्ये प्रवेश करून वेगळा ठसा निर्माण केला आहे. आपने सांगे मतदारसंघात देसाई यांना उमेदवारी घोषित केली असून ते सध्या सक्रिय आहेत. ते घरोघरी भेट देत असून प्रचार जोरात पुढे नेत आहेत. नेत्रावळी पंचायतीचे उपसरपंच असलेल्या देसाई यांनी 2020 सालची जिल्हा पंचायत निवडणूक लढवून आपले अस्तित्व सिद्ध केलेले आहे. नेत्रावळीत त्यांचा चांगला जम बसलेला आहे. आप हा सांगेसाठी नवा असला, तरी अभिजित देसाई नवीन नाहीत.
तृणमूल, आरजीही रिंगणात
आरजीने आपले कार्य चालू केले असून यापूर्वीच त्यांनी सुनील गावकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. काँग्रेस पक्षात प्रवक्त्या राहिलेल्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी काँग्रेसचा त्याग करून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या त्या प्रचारकार्यात आपल्या सहकाऱयांसह सहभागी झालेल्या असून घरोघरी भेटी देण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. तृणमूलची उमेदवारी राखी यांना मिळण्याची दाट शक्मयता वर्तविली जात आहे. सध्या त्या प्रत्येक गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेत आहेत. तृणमूलने माजी आमदार प्रसाद गावकर यांना टार्गेट बनविले असून सोशल मीडियावर विकासाच्या बाबतीत अपूर्ण राहिलेली कामे व समस्या यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यंदाची निवडणूक ही सांगेचे भविष्य घडवणारी असून विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन त्या करत आहेत. नेत्रावळी येथील रमेश वेलिंगकर हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
भाजपाचे सुभाष फळदेसाई आणि सावित्री कवळेकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पक्षाची संघटना फळदेसाई यांच्याबरोबर आहे, तर दुसरीकडे सावित्री कवळेकर यांनी आपली स्वतःची यंत्रणा उभी केली आहे. अपक्ष म्हणून लढण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी दाखविली आहे. गत विधानसभा निवडणुकीपासून त्या सक्रिय असून त्यांनी स्वतःची अशी व्होट बँक निर्माण केली आहे. भाजपाने त्यांना तिकीट दिली, तर उत्तम, पण तसे न झाल्यासही त्या निवडणूक रिंगणात असतील असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत असून ते नाकारता येत नाही, भाजपसमोर मोठा गुंता आहे. एकूण चित्र पाहता पंचरंगी लढत अपेक्षित आहे. त्यात कोण बाजी मारेल हे पाहावे लागेल.