आवश्यक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची विद्यमान नगरसेवकांची जबाबदारी
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहरातील संपूर्ण सांडपाणी मलप्रभा नदीला जाऊन मिळत असल्याने पवित्र मलप्रभा दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. आता या सांडपाण्यामुळे मलप्रभा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या काही गावांनाही धोका निर्माण झाला असून शहराचे सांडपाणी मलप्रभा नदीत सोडू नये, या मागणीसाठी करंबळ, रुमेवाडी, कुप्पटगिरी, जळगा, चापगाव, यडोगा, बलोगा येथील नागरिकांनी यापूर्वी अनेकवेळा तहसीलदार व नगरपंचायतीवर मोर्चा काढून निवेदने दिली. पण आश्वासनापलीकडे अद्याप काहीच मिळाले नाही.
शहराच्या सखल भागातून मलप्रभा नदी वाहते. व संपूर्ण गाव नदी काठावरुन वरच्या भागात पसरलेले असल्याने शहरातील सारे सांडपाणी आपोआपच मलप्रभा नदीमध्ये येऊन मिळते. पूर्वी खानापूर शहर मर्यादित होते. नदीतील पाणी उपसाही मर्यादित होता. यामुळे नदीत जाणाऱया सांडपाण्याचा प्रादुर्भाव जाणवत नव्हता. पण दिवसेंदिवस खानापूर शहराची व्याप्ती वाढत चालली. तसेच नदीतील पाण्याचा उपसाही वाढला. साहजिकच शहराच्या तीन भागातून संपूर्ण सांडपाणी मलप्रभा नदीत येऊ लागले. यामुळे दिवसेंदिवस मलप्रभा नदीतील पाणी प्रदूषित होत चालली. शहराचे तीन भागातून येणारे सांडपाणी एकत्रित येऊन त्याचा निचरा एका ठिकाणी व्हावा यासाठी नगरपंचायतीने काही उपाययोजना केल्या. पण चुकीच्या आराखडय़ामुळे त्या यशस्वी ठरल्या नाहीत. अखेर घाटबांधकाम करताना मठाकडून मलप्रभेत येणारे सांडपाणी पाईपलाईनद्वारे जुन्या पुलाच्या पलीकडे सोडण्यासाठी योजना आखली. शहराच्या काही भागाचे पाणी पारिश्वाड क्रॉसमार्गे जुन्या पुलाकडे येऊन मिळते. मठाकडून येणारेही पाणी पुलापलीकडे फेकण्यात आले. यामुळे आता संपूर्ण शहराचे सांडपाणी पुलाच्या खालच्या बाजूने मलप्रभा नदीमध्ये मोठय़ा प्रमाणात मिसळत असून त्यामुळे या भागात मलप्रभा नदी म्हणजे एकप्रकारे नरक गंगाच बनली आहे. ते पाणी आता मलप्रभा नदीत जात असल्याने त्या पाण्याचा नकळत धोका कुप्पटगिरी, करंबळ, रुमेवाडी, जळगा, बलोगा, यडोगा, चापगाव आदी गावाना निर्माण झाला असून त्यांना अस्वच्छ पाणी मिळत आहे. विशेषत: जानेवारी महिन्यानंतर त्या पाण्याला इतकी दुर्गंधी असते की, माणसे तर सोडा, जनावरे देखील ती पित नाहीत, यामुळे आता सर्व गावांनी एकत्रित येऊन शहराच्या सांडपाण्याविरुद्ध नगरपंचायत तसेच तहसीलदार कार्यालयावर मोर्चेही काढले. आश्वासनही देण्यात आले. पण आश्वासन कागदावरच राहिले. त्यामध्ये कोणतीच प्रगती न झाल्याने परिस्थिती जैसे ‘थे’च आहे. देशातील 12 पवित्र नद्यामध्ये मलप्रभा नदीचाही समावेश आहे. यामुळे मलप्रभा स्नानासाठी खानापूर तालुक्याबरोबरच बेळगाव, धारवाड, चंदगड आदी भागातून भाविक मोठय़ा संख्येने येत असतो. पण अशा सांडपाण्यामुळे त्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण होतो.
सांडपाणी एकाएकी बंद करणे कठीण
परंतु, मलप्रभेतील सांडपाणी एकाएकी बंद करणे नगरप्रशासनालाही कठीण आहे. यामुळे शहरात भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची अंमलबजावणी करणे हाच एकमेव मार्ग आहे. यासाठी नगरपंचायतीकडून पूर्वीपासून प्रयत्न सुरू असले तरी त्याचा पाठपुरावा योग्यप्रकारे होत नसल्याने हा प्रकल्प मार्गी लावण्यात अडचणी आल्या आहेत. 2002 साली तत्कालीन आमदार अशोक पाटील यांनी राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर करुन घेतला. त्याचे एका खासगी कंपनीकडून सर्वेक्षण केले. योजनेचा आराखडाही तयार झाला. त्यावेळी योजनेला 6 कोटी रु. खर्च अपेक्षित होता. आराखडा तयार झाल्यानंतर दुर्दैवाने आमदार अशोक पाटील यांचे निधन झाले. यानंतर त्या योजनेचा कुणीच पाठपुरावा न केल्यामुळे योजना मंजूर होऊ शकली नाही. 2008 साली तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. त्यावेळी प्रशासनाने याची दखल घेऊन प्रकल्पाचा नव्याने आराखडा तयार करण्यासाठी नगरपंचायतीला 13 लाख रु. भरण्याचा आदेश बजावला. नगरपंचायतीने याची तातडीने अंमलबजावणी करुन 13 लाख रु. राज्य शहरी भुयारी गटार तसेच पाणीपुरवठा मंडळाकडे सुपूर्द केले. यानंतर पुन्हा योजनेचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले. त्यानंतर आराखडा तयार केला. व तो अभियंत्यांकडे सुपूर्द केला. पण पाठपुराव्याअभावी योजना मंजुरीचे काम रखडले.
योजनेला तातडीने मंजुरी मिळणे गरजेचे
नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी योजनेला तातडीने मंजुरी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील नदी नाले प्रदूषण मुक्त करण्यावर तसेच स्वच्छता अभियानावर विशेष जोर दिला आहे. अशा परिस्थितीत सदर योजनेचा योग्यप्रकारे पाठपुरावा झाल्यास शहराची भुयारी गटार तसेच सांडपाणी प्रक्रिया योजना मंजूर होण्यास अडचणी येणार नाहीत.
सदर पाणी सध्या अस्तित्वात असलेल्या त्या गटाऱयांच्या रचनेत थोडाफार बदल करुन मठाकडून तसेच इतर भागाकडून येणारे सांडपाणी जुन्या बसस्टँडमार्गे पाणंद रस्त्यातून कुप्पटगिरी नाल्यातही सोडता येते. जर कुप्पटगिरी नाल्यात ते सांडपाणी सोडल्यास त्याचा नकळत फायदा परिसरातील शेतकऱयांनाही होऊ शकतो. यासाठी कुप्पटगिरी नाला ज्या ठिकाणी मलप्रभेला मिळतो. त्या ठिकाणी बंधारा बांधून संपूर्ण सांडपाणी त्या नाल्यात साठवता येईल, व पावसाळय़ात बंधाऱयाच्या फळय़ा काढून पुराच्या पाण्यावर ते पाणी वाहून जाऊ शकेल, पण ही योजनादेखील तात्पुरती होणार आहे. यामुळे कुठल्याही परिस्थितीत मलप्रभेला सांडपाण्यापासून मुक्त करण्यासाठी भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हाच त्या वरचा रामबाण उपाय ठरू शकेल, यासाठी खासदार अनंतकुमार हेगडे, आमदार अंजली निंबाळक तसेच नगरपंचायतीने पाठपुरावा केल्यास या प्रकल्प मंजुरीला कोणतीच अडचण येणार नाही.