प्रतिनिधी /बेळगाव
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी ही कामे अर्धवट स्थितीत ठेवण्यात आल्याने समस्या निर्माण झालेली आहे. येथील आरपीडी क्रॉसजवळ रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्यात आले आहे. मात्र, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यास जागा नसल्याने सांडपाणी रस्त्याच्या कडेला साठत आहे.
येथील गटारीचे बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. सांडपाणी एकाच ठिकाणी साचून दलदल निर्माण झालेली आहे. हे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. पाऊस पडला की या ठिकाणी सदर समस्या डोके वर काढते. याबाबत महापालिकेला अनेक वेळा सांगूनदेखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा नाहक फटका नागरिकांना सहन करावा लागत असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे येथील समस्येचे निवारण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.