प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहरापासून सांबरापर्यंत एअरपोर्ट रोडवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. अरुंद रस्ता व रस्त्याशेजारी बेशिस्त पद्धतीने लावण्यात आलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एअरपोर्ट रोडवरची वाहतूक कोंडी दूर करावी, अन्यथा या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी विमान प्रवाशांकडून केली जात आहे.
देशातील एक महत्त्वाचे विमानतळ म्हणून बेळगावची ओळख आहे. या विमानतळावरून दररोज 1200 ते 1300 प्रवासी प्रवास करत असतात. यामुळे बेळगाव शहरापासून सांबरा विमानतळापर्यंत वाहनांची ये-जा असते. अनेक व्हीआयपी व्यक्ती विमानाने बेळगावात दाखल झाल्यानंतर आलेल्या व्यक्तींना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे बऱयाच वेळा विमानतळावर वेळेत न पोहोचल्याने विमानही चुकत असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत.
बेळगाव-सांबरा मार्गाचे चौपदरीकरण झाल्यास वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. या मार्गावर अनेक व्यावसायिक आस्थापने असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे एकतर या मार्गाचे चौपदरीकरण करा अथवा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी विमान प्रवासी करीत आहेत.