पाथरीच्या ग्रामसभेत ठराव मंजूर : शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
परभणी, पुणे / प्रतिनिधी :
साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत निर्माण झालेला वाद मिटल्याचे सांगितले जात असतानाच साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हेच असल्याचा ठराव पाथरीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. आता पाथरीचे शिष्टमंडळ आज (बुधवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, यासंदर्भात समिती नेमण्यात यावी, अशी विनंती ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. पाथरीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत पाथरीकर आक्रमक झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यावर पाथरी नव्हे, तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत बंद पुकारला होता. यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि बंद मागे घेण्याची विनंतीही केली होती. या विनंतीला मान देत शिर्डीकरांनी रविवारी रात्री बंद मागे घेतला. या प्रश्नावर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर यशस्वी तोडगा काढला.
हा वाद मिटल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात तसे दिसत नाही. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच आहे, असा ठराव पाथरीच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. यासंदर्भात एक समिती नेमली जावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार असल्याचे सांगण्यात आले. पाथरीतील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहे. त्यामुळे जन्मस्थळाचा वाद अद्याप मिटला नसल्यावरच शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. आता उद्या याबाबत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.