दीपक नार्वेकर बीपीसी क्रिकेट स्पर्धा
बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
दीपक नार्वेकर बीपीसी चषक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात समर्थ शेट्टीच्या भेदक गोलंदाजीवर साईराज वॉरियर्सने गणेश ज्वेलर्स संघाचा 19 धावांनी तर विश्रृत ट्रायकर्सने आनंद चॅलेंजरचा 13 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू समर्थ शेट्टी (साईराज वॉरियर्स), दीपक राक्षे (विश्रृत स्ट्रायकर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
साईराज वॉरियर्स संघाने 25 षटकांत 8 बाद 144 धावा केल्या. त्यात विनित पाटीलने 31, वैभव कुरीबागीने 23, गणेश ज्वेलर्सतर्फे अनिष भूषदने 33 धावांत 4, सुकल शेट्टी, चिन्मय साठे, आदर्श हिरेमठ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्सने 25 षटकांत 9 बाद 125 धावा केल्या. ओमकार वेर्णेकरने 29, नवनीत शिरगांवीने 25, व्यंकटेश शिराळकरने 26 धावा केल्या. साईराजतर्फे समर्थ शेट्टीने 21 धावांत 5 गडी बाद करीत निम्मा संघ गारद केला. प्रकाश असलकरने 29 धावांत 2 तर वैभव कुरीबागीने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात विश्रृत स्ट्रायकर्सने 25 षटकांत सर्वबाद 143 धावा केल्या. रविचंद्र उकळीने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 41, सिद्धार्थ गोदवाणीने 29, विकी सावंतने 24 तर ओम पाटीलने 22 धावा केल्या. आनंद चॅलेंजरतर्फे अधोक्षज मानवीने 26 धावांत 7 गडी बाद केले. महमद कैफ मुल्ला व अनिकेत लोहार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर आनंद चॅलेंजरला 25 षटकांत 9 बाद 130 धावांच करता आल्या. जेनित मुडबागीलने 53 धावा करून अर्धशतक झळकविले. शुभम नागेशने 27 तर यश हावळाण्णाचेने नाबाद 21 धावा केल्या. विश्रृत स्ट्रायकर्सतर्फे हार्दिक काटनेने 26 धावांत 2, दीपक राक्षेने 11 धावांत 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विजय कुलकर्णी, नारायण पाटील, जयसिंह राजपूत यांच्या हस्ते समर्थ शेट्टीला तर उमा कुंदरनाड, दीपा देसुरकर, विकास देसाई, आशिष चव्हाण यांच्या हस्ते दीपक राक्षे याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अंतिम सामना रविवारी सकाळी 10 वाजता साईराज वॉरियर्स वि. विश्रृत स्ट्रायकर्स यांच्यात होणार आहे.
गोलंदाजीत मानवीचा नवा विक्रम
आजच्या सामन्यात आनंद चॅलेंजरचा खेळाडू अधोक्षज मानवीने 26 धावांत 7 गडी बाद करीत जिमखाना मैदानावर नवीन विक्रम केला. पण तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही.