ऑनलाईन टीम / शिर्डी :
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांच्या कथित जन्मस्थळाचा विकास करण्याची घोषणा केल्याने शिर्डीकर पुरते नाराज झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून शिर्डी शहरात प्रमुख कार्यकर्ते बैठका घेत आहेत. त्यामध्ये सरकारवर दबाव आणण्याची रणनीती तयार केली जात आहे. त्यानुसार रविवार पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.
साईबाबा यांची मुख्य समाधी अहमदनगर जिह्यातील शिर्डी येथे आहे. याठिकाणी वर्षाकाठी अंदाजे तीन कोटी भाविक येतात. त्यामुळे शिर्डीला अनेक सवलती बहाल झालेल्या आहेत. खास करून सर्वधर्म समभावाची शिकवण साईबाबांनी जगात रुजवली. त्यांच्या या शिकवणीला त्यांचे जन्मगाव जाहीर झाल्यास तडा जाणार आहे. अशा शंकेने शिर्डीकर अस्वस्थ झालेले आहेत. नूतन सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ातील पाथरी शहराचा साईबाबा जन्मभूमी म्हणून विकास करण्याची घोषणा केली. त्यामुळे शिर्डीचे महत्त्व कमी होते की काय या शंकेने शिर्डीकरांच्या मनात घर केले आहे. त्यातून शिर्डीच्या लहानमोठय़ा कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे.
त्यावर उपाय म्हणून सरकार वर दबाव टाकण्याची प्रभावी रणनीती आखली जात आहे, की जेणेकरून पाथरीला साईबाबा जन्मभूमीचा दर्जा मिळू नये. याचाच एक भाग म्हणून रविवार पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. आज (शनिवार) ग्रामसभा घेऊन परिसरातील ग्रामपंचायतीचे या बंदला पाठिंबा देण्याचे आव्हान करणार असल्याची माहिती नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतून समोर आली आहे.
शिर्डीकरांच्या या दबावतंत्राला सध्यातरी सर्वपक्षीय कार्यकर्ते हे साईभक्त म्हणून एकत्र आल्याचे चित्र आहे. मात्र, रविवारी बंदला कसा प्रतिसाद मिळतो, यावर पुढचे हे दबाव आंदोलन काय रूप घेते हे उघड होईल. तूर्तास पाथरीकर व शिर्डीकर आपापल्या परीने कागदी पुरावे देऊन एकमेकांचे दावे कसे कमकुवत आहे, हे दाखविण्यात अग्रेसर आहेत.