प्रतिनिधी /बेळगाव
नुकसानग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कलामंदिरशेजारी साई मंदिर रोडजवळ मनपाने व्यापारी संकुलाची उभारणी केली आहे. मात्र 2014 पासून हे संकुल वापराविना रिकामेच आहे. काही व्यावसायिकांनी टाळे तोडून अतिक्रमण केले होते. त्यामुळे कलामंदिर येथील कारवाईवेळी मनपाच्या महसूल विभागाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
रस्ता रुंदीकरणात नुकसान झालेल्यांना खोकी घालण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली होती. पण जागतिक कन्नड संमेलनावेळी फेरीवाले व रस्त्याशेजारील व्यावसायिकांना हटविण्यात आले होते. त्यावेळी सर्व खोकी हटविण्यात आल्याने उदरनिर्वाह कसा करायचा? असा मुद्दा खोकीधारकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने साई मंदिर रस्त्याशेजारी 56 गाळय़ांची उभारणी केली होती. मात्र सदर गाळे व्यावसायिकांना देण्यात आले नाहीत. लिलाव आयोजित करून गाळे भाडेतत्त्वावर देण्यात यावेत, अशी सूचना नगरविकास खात्याने केली होती. पण नुकसानग्रस्तांना विनाभाडे गाळे देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे गाळे हस्तांतराचा वाद निर्माण झाला होता. परिणामी हे गाळे हस्तांतर करण्यात आले नाहीत.
सदर गाळय़ांमध्ये काही व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केले आहेत. तर काही गाळय़ांना मनपाने टाळे लावून बंद ठेवले होते. सदर टाळे तोडून भाजीविपेत्यांनी अतिक्रमण केले होते. कलामंदिरच्या जागेतील मालमत्ता हटविण्यास गेलेल्या अधिकाऱयांनी साई मंदिर रोडवरील व्यापारी गाळय़ांतील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला व सहा गाळय़ांमध्ये अनधिकृतरित्या ठेवण्यात आलेले साहित्य मनपाने वाहनात भरले. याच दरम्यान व्यावसायिक याठिकाणी दाखल झाले. साहित्य परत देण्याची विनंती अधिकाऱयांकडे केली. पुन्हा आपण याठिकाणी साहित्य ठेवणार नाही, असे सांगण्यात आल्यानंतर साहित्य परत करण्यात आले.