ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात साक्षरतेमध्ये केरळने पहिले स्थान कायम राखले आहे. केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण 96.2 टक्के आहे. त्यामध्ये 97.4 टक्के पुरुष तर 95.2 टक्के साक्षर महिला आहेत. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भात जाहीर केलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली.
देशात पहिल्या पाच सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा नंबर लागतो. तर दक्षिणेकडील आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये 87.6 टक्के, आसाममध्ये 85.9 टक्के आहे.
भारतात साक्षरतेचे सरासरी प्रमाण 77.7 टक्के आहे. त्यामध्ये 84.7 टक्के पुरुष तर 70.3 टक्के महिला साक्षर आहेत. पुरुष आणि महिला साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेतले तर त्यात 14.4 टक्के अंतर आहे. साक्षरतेमध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण 84.8 टक्के आहे. त्यामध्ये 90.4 टक्के पुरुष तर महिला 78.4 टक्के साक्षर आहेत. पुरुष आणि महिला साक्षरतेच्या प्रमाणात 12.3 टक्क्यांचे अंतर आहे.