क्रीडा मंत्रालयाचा निर्णय, पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार देण्यास मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिक कांस्यविजेती महिला मल्ल साक्षी मलिक व वर्ल्ड चॅम्पियन महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू या खेलरत्न पुरस्कार विजेत्या खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. त्यामुळे अर्जुन पुरस्कारांसाठी क्रीडापटूंची संख्या आता 27 करण्यात आली असून खेलरत्नसाठी शिफारस झालेल्या पाचही खेळाडूंना मंजुरी देण्यात आली आहे. पाच खेळाडूंना खेलरत्न देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या आठवडय़ात निवृत्त न्याया. मुकुंदकम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी 29 खेळाडूंची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. त्यात साक्षी मलिक व मीराबाई चानू यांचाही समावेश होता. त्या दोघींनाही याआधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याने त्यांना अर्जुन पुरस्कार देण्याचा निर्णय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर सोपविण्यात आला होता. त्यावर त्यांनी शुक्रवारी निर्णय घेताना या यादीतून त्यांना वगळले आहे. त्यांच्या नावांची शिफारस झाली तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त करून टीकाही करण्यात आली होती.
खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंत स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला मल्ल विनेश फोगट, पॅरालिम्पिक उंच उडीपटू मरियप्पन थांगवेलू, महिला हॉकीपटू रानी रामपाल व महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांचा समावेश आहे. त्यांना खेलरत्नसाठी मंजुरी देण्यात आली असल्याची औपचारिक घोषणा मंत्रालयाने केली आहे. 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी या पुरस्कारांचे व्हर्च्युअल वितरण होणार आहे. दरवर्षी राष्ट्रपती भवनात त्याचे आयोजन करण्यात येते. मात्र यावेळी कोरोना महामारी संकटामुळे पहिल्यांदाच त्याचे व्हर्च्युअल वितरण केले जाणार आहे.