ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
साखरपुड्यासाठी निघालेली बस 50 प्रवाशांसह 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये शनिवारी रात्री घडली. या अपघातात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 45 प्रवाशी जखमी झाली आहेत. जखमींना तिरूपतीच्या रुया सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून एक खासगी बस शनिवारी रात्री तिरुपतीला साखरपुड्यासाठी निघाली होती. बसमध्ये 50 लोक होते. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर बाकरपेट येथे एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस 100 फूट खोल दरीत कोसळली. दरम्यान, स्थानिक लोकांनी तात्काळ अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी धाव घेत चंद्रगिरी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. 9 रुग्णवाहिका, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाचे एक विशेष पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतलं. अंधार आणि घनदाट जंगलामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. अथक प्रयत्नानंतर सात प्रवाशांचे मृतदेह आणि 45 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना रुया सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.