चालू सत्रामध्ये उत्पादन 13 टक्क्यांनी वाढले- ऊसाचे उत्पादन अधिक झाल्याचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील ऊस उत्पादन अधिक प्रमाणात झाल्याच्या कारणामुळे व्यापरी वर्ष 2020-21 मधील 15 जूनपर्यंत साखर उत्पादन हे 13 टक्क्यांनी वाढून 306.65 लाख टनावर पोहोचले आहे. साखरेचे व्यापारी वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत या कालावधीमध्ये असते, अशी माहिती भारतीय साखर कारखाना संघ (इस्मा) यांनी दिली आहे.
सदरच्या उत्पादनासोबत देशात आतापर्यंत साखर निर्यातीसाठी 58 लाख टनाची मर्यादा निश्चित केली असून यात 45 लाख टनापेक्षा अधिकची साखर निर्यात करण्यात आली असल्याची माहिती आहे. देशभरात साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 2020 आणि 15 जून 2021 या कालावधीत 306.65 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन मागील वर्षातील समान कालावधीत 271.11 लाख टनापेक्षा 35.54 लाख टनांनी अधिक राहिले आहे.
उत्तरप्रदेशमध्ये साखर उत्पादन वर्ष 2020-21 मध्ये 15 जूनपर्यंत 110.61 लाख टन झाले आहे. मागील वर्षात या कालावधीत उत्पादन 126.30 लाख टनावर राहिले होते. तुलनात्मकदृष्टय़ा महाराष्ट्रात साखर उत्पादन पहिल्यांदा 61.69 लाख टनानी वाढून 106.28 लाख टन झाले आहे. कर्नाटकात पाहिल्यास 33.80 लाख टनानी वाढून 41.67 लाख टनाच्या घरात साखरेचे उत्पादन पोहोचले आहे.
70 लाख टन निर्यातीचा अंदाज
मागील सत्राच्या तुलनेत चालू वर्षातील सप्टेंबरपर्यंत 8 ते 10 लाख टनापेक्षा अधिक देशात विक्री झाली असून चालू वर्षामध्ये साखर निर्यातीचे 70 लाख टनाचे ध्येय निश्चित केले आहे. जी उद्योगविश्वाला दिलासा देणारी बाब ठरणार असल्याचेही इस्माने स्पष्ट केले आहे.