मंत्री एम. टी. बी. नागराज यांची सूचना : बिले देण्यात अपयशी ठरल्यास कारवाइ
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे ऊस उत्पादक संकटात आहेत. असा परिस्थितीत साखर कारखान्यांनी शेतकऱयांची ऊसबिले शिल्लक ठेवून घेणे योग्य नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी ऊसाची थकीत बिले त्वरित शेतकऱयांच्या खात्यात जमा करावी, अशी सूचना मंत्री एम. टी. नागराज यांनी दिली. जर साखर कारखानदार थकीत बिले देण्यात अपयशी ठरल्यास ऊस नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करून वसुलीसाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यात 2020-21 या वर्षाच्या गळीत हंगामात 64 साखर कारखान्यांनी 440.84 लाख मेट्रीक टन ऊस गाळप करून 42.94 मेट्रीक टन साखर उत्पादन केले आहे. या कालावधीत साखर कारखान्यांकडून शेतकऱयांची 13,348.10 कोटी रुपयांपैकी 12,058.17 कोटी रुपये ऊसबिले दिली आहेत. तर 1,324.49 कोटी रु.ची बिले देणे बाकी आहेत. ही थकीत बिले त्वरित द्यावीत. यासंबंधी कार्यवाही करण्याची आणि बिले न देणाऱया कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आल्याचे मंत्री एम. टी. बी. नागराज यांनी सांगितले.
दरम्यान, साखर कारखान्यांकडून जुनी बाकी 28.38 काटी रुपये इतकी आहे. यापैकी 2015-16 सालातील 11.37 कोटी रु. 2018-19 या वर्षातील 11.20 कोटी रु., आणि 2019-20 या वर्षातील 5.80 कोटी रु. ऊसबिले देणे बाकी आहेत. हे कारखाने बंद असून कारखान्यांची स्थावर मालमत्तेचा लिलाव करून वसुली करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.