होलसेल दुकान ही बंद : यादीतील दुकानांना फोन केला तर हजार रुपयांचा माल घेण्याची केली जाते गळ
प्रतिनिधी/ सातारा
संपूर्ण सातारा शहरात गेल्या चार दिवसांपासून लॉकडाऊन कडक केले आहे. त्यामध्ये दुकाने आणि मेडिकल दुकाने ही बंद ठेवण्यात आली आहेत. हे सारे जरी सातारकर नागरिकांच्या हितासाठी केले असले तरीही नागरिकांच्या मूलभूत गरजा मात्र त्यांना मिळत नाहीत. ज्या दुकानांची प्रशासनाने यादी जाहीर केली आहे त्यातील काही दुकानाकडे साखर नाही, किरकोळ बाबीसाठी फोन करू नका असे बजावले जाते. घरात धान्य असून ही पिठाच्या गिरणी बंद असल्याने करायचे काय?, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य सातारकर नागरिकांना पडू लागले आहेत. प्रशासनाने लॉकडाऊन नियोजन करावे अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सातारा शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून तसा प्रशासनाने लॉक डाऊनचा कडक फास आवळला. वास्तविक शहरातील स्थानिक नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरीही यामुळे अनेक त्रुटी आहेत, असा आरोप सातारकर नागरीक करू लागले आहेत. शहरात सर्व दुकाने बंद करणायत आली. पिठाची गिरणी बंद करण्यात आली. मेडिकल बंद ठेवण्यात आली. रेशनची 56 दुकाने बंद आहेत. होलसेलची दुकाने बंद आहेत. असे सारे बंद असताना प्रशासनाने केवळ काही दुकानांची यादी जाहीर केली होती. त्या दुकानदारांना फोन करा घरपोहच किराणा माल मिळेल असे जाहीर केले होते. वास्तविक त्या किराणा दुकानदाराकडे अगोदरच कामगार नाहीत. माल पोहचवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत. ग्राहकाच्या पत्यावर किरकोळ माल देणं त्याला ही तसे खर्चिक आहे. त्यामुळे त्याच्याकडून माल किमान एक हजार रुपयांचा तरी खरेदी करावा, अशी गळ घातली जात आहे. पिठाच्या गिरणी बंद असल्याने शहरातील काही नागरिकांच्या घरात गहू आहेत, ज्वारी आहे पण पीठ संपलं आहे, प्रत्येकाच्या घरात आटा चक्की असेलच असे नाही. त्यामुळे किमान दोन तास तरी पिठाची चक्की सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दूधवाल्याचे दूध जाते नासुन
माणसाला सद्या जगणं महत्वाचे असून त्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. शहर सगळे बंद केल्याने शहरात येणारे दूध हे सांबरवाडी, यवतेश्वर, परळी या भागातून येते. समर्थ मंदिर बोगदा हा रस्ता बंद केला गेल्याने व तेथे अडवणूक केली गेल्याने दूध विक्री करणाऱया शेतकऱयांचे दूध नासुन जाते, अशा ही तक्रारी काही शेतकऱयांनी व्यक्त केल्या.
पाच दिवसांपासून भाजीपाला नाही
लॉकडाऊनच्या सुरुवातीला सातारा पालिकेने घरपोहच भाजी विक्री करण्यासाठी काहींना परवाने दिले होते. तो प्रयोग अयशस्वी झाला. मात्र, तोच प्रयोग इतर शहरात चांगला चालला आहे. वाढीव दराने जरी भाजी मिळत होती. परंतु भाजीपाला ही आता मिळत नाही. त्यामुळे घरात असलेली डाळीवर दिवस सातारकर नागरिकाना काढावे लागत आहेत. घरपोहच भाजी विक्रीची सोय करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
गुटखा कसा काय मिळतो?
एवढे सारे शहरात कडक असताना ही काही ठिकाणी गुटखा कसा मिळतो?, तो नेमका कसा पोहच होतो असा ही सवाल अनेक सातारकरानी उपस्थित केला आहे.
पाळीव जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर
शहरात सुमारे 50 पशुपालक व दोन गोशाळा आहेत. या जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न तसा गंभीर बनला आहे. पशुखाद्याची दुकानेही बंद, गिरणी ही बंद असल्याने चाऱया अभावी दावणीवरच ही जनावरे माना टाकण्याची भीती असून घरातील गहू, तांदूळ त्यांना खायला घालत आहेत, असे काही पशुपालकांनी सांगितले.