सगलानी गटातील नगरसेवकांचा दावा. सरकारच्या सर्व हल्ल्यांविरूध्द उत्तर देण्यास तयार. साखळीवासीयांची कामे थांबणार नाही.
डिचोली/प्रतिनिधी
साखळी नगरपालिकेची सत्ता निवडणुकीत, त्यानंतर आमच्या गटातील नगरसेवक फोडूनही मिळविण्यास सपशेल फोल ठरलेल्या भाजप सरकारने आणि स्थानिक भाजप प्रतिनिधीने थेट आमच्या गटातील नगरसेवकांनाच अपात्र करून मिळविण्याचे प्रयत्न भाजपच्याच अंगावर उलटणार. येणाऱया निवडणुकीत साखळीत घडवून आणलेले हे अनैतिक राजकारण भाजपला चांगलेच भोवणार, अशी प्रतिक्रिया साखळी नगरपालिकेच्या सगलानी गटातील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. सरकारने सत्तेचा गैरवापर करीत कितीही छळण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही त्यांनी म्हटले.
साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राया पार्सेकर व उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांच्या विरोधात नगरपालिका संचालनालयाकडे सादर केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर मंगळवारी राज्याचे कायदामंत्री निलेश काब्राल यांच्यासमक्ष सुनावणी होऊन त्यांनी या दोघाही नगरसेवकांना अपात्र ठरविले. मात्र अपात्र ठरवूनही या आदेशाला उच्च न्यायालयाने आगाऊच दिलेल्या 15 दिवसांच्या स्थगितीमुळे अद्याप नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना खुर्ची सोडण्याची सक्ती करता आली नाही.
या प्रकरणाची सुनावणी नगरनियोजनमंत्र्यां? समोर सुरू होती तेव्हा मंत्र्यांकडून दोन, तीन दिवसांच्या फरकाने सुनावणीची तारीख देण्यात येत होती. त्यामुळे त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली होती. त्या याचिकेवर याचिकादारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने आदेश देत अपात्रतता याचिका निकालात येऊन जर दोघांनाही अपात्र ठरविण्यात आले तर सदर आदेशाला 15 दिवसांची स्थगिती देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने आगाऊपणेच दिला होता. त्यामुळे आज सदर दोन्ही नगरसेवकांना जरी अपात्र केले असले तरी सदर आदेशाला आपोआपच पंधरा दिवसांची स्थगिती मिळणार आहे. या 15 दिवसांच्या स्थगिती काळात दोन्ही नगरसेवक रितसरपणे न्यायालयात आपल्या विरोधात जारी करण्यात आलेल्या अपात्रतेच्या आदेशाला आव्हान देणार आहेत.
सत्य आणि देव आमच्या बाजूने – राया पार्सेकर
साखळीत आमच्या मंडळातर्फे सुरू असलेल्या कामांमुळे विचलीत झालेल्या आणि सत्तेसाठी हापापलेल्या विरोधी नगरसेवकांनी केलेले कृत्य हे भ्याड आहे. आज या राजकारण आणि तांत्रिक बाबीचा अभ्यास आम्हीही करू लागले असल्याने या प्रकाराला न्यायालयात आव्हान देऊन योग्य ते उत्तर देणार आहे. सरकारचा होत असलेला मोठा हस्तक्षेप हा लज्जास्पद आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. त्यासाठीच येणाऱया काळात या संपूर्ण राजकारणाचा हिशोब या सरकारला जनतेकडून मिळणार आहे. सत्य आणि देव आमच्या बाजूने असल्याने यापूर्वीप्रमाणेच यापुढेही विजय आमचाच होणार, असा विश्वास नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी व्यक्त केला.
सरकारच्या या छळवादाविरोधात लढण्याचे आव्हान स्विकारले आहे – राजेश सावळ
राजकारणात आल्यानंतर आरोप, प्रत्यारोप, राजकीय कारस्थाने अशा गोष्टी नित्याच्याच. साखळीतही सध्या राजकीय पातळीवर आमचा छळवाद विद्यमान सरकारने आणि लोकप्रतिनिधीने आमच्या विरोधात सत्ता आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर चालविला आहे. या छळवादाविरोधात लढण्याचे आम्ही आव्हान केव्हाच स्विकारले आहे. साखळीतील राजकारण इतक्मया खालच्या थराला जाणार याचा अंदाजही आम्ही केला नव्हता. या सर्व गोष्टींतून सरकारने आपल्यावरील विश्वास गमावला आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आणि तेथेच सरकारच्या या कृतीविरोधात आम्हाला न्याय मिळणार. सरकारविरोधात आज लोकांच्या मनात असंतोषाचा ज्वालामुखी खदखदत आहे. लोक बोलत नाहीत याचा अर्थ लोकांनी तोंडांबरोबर कान आणि डोळेही बंद ठेवलेले नाहीत. जनता योग्य वेळेच्या शोधात आहे. ती योग्य वेळी आपला रोष दाखवून देत खदखदत असलेल्या ज्वालामुखीचा स्पोट घडवून दाखविणार, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी व्यक्त केली.
सगलानी गटाच्या भितीनेच हे भ्याड कृत्य – धर्मेश सगलानी.
साखळी नगरपालिकेत आम्हाला लोकांनी स्पष्ट बहुमत दिले आणि आमची सत्ता स्थापन झाली. हि सत्ता खाली खेचण्यासाठी भाजप सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना पावलोपावली आलेले यश सर्वश्रुत आहे. पालिकेची सत्ता गैरमार्गाने हस्तगत करूनही ती योग्य मार्गाने आम्ही पुन्हा मिळवली आणि लोकांची ज्या पध्दतीने सगलानी गटाकडून कामे सुरू झाली होती. तो कामांचा वेग आणि सगलानी गटावर लोकांचा वाढणारा विश्वास पाहून भाजप सरकारने भितीपोटी हे भ्याड कृत्य केलेले आहे. याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया होणारच आणि पुन्हा विजयही आमचाच होणार. या प्रकारामुळे साखळीवासीयांची कामे बंद राहणार नाही. आमच्या गटाकडून जनतेच्या कामांना यापूर्वीप्रमाणेच प्राधान्य दिले जाणार आहे, असे नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी म्हटले.