गोव्यात योग्य ती साधनसुविधा उभारणार : श्रीपाद नाईक, नॉर्टिकल टुरिझम कॉन्फरन्समध्ये प्रत्येकाने मांडल्या समस्या, दोनापावला येथे आयोजन
प्रतिनिधी /पणजी
सागरी पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी गोव्यात योग्य ती साधनसुविधा उभारू असे आश्वासन केंद्रीय पर्यटन तथा पोर्ट व शिपिंग राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले. नॉर्टिकल टुरिझम कॉन्फरन्सच्या वेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
सागरी पर्यटनाला जगभरात मोठी मागणी आहे. हे पर्यटन सर्वात आलीशान, महागडे व सुरक्षित मानले जाते. प्रदूषण आणि विषाणूचा धोका कमी संभवतो. प्रत्येकजण सागरी सफरीची मनिषा धरून असतो. महामारीचा परिणाम जगभर झाला. पर्यटन क्षेत्रही त्यातून सुटले नाही. तरी देशी पर्यटकांनी थोडाफार हा व्यवसाय तारला. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेण्यासाठी सागरी पर्यटनावर भर देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
सुदैवाने आपण पर्यटन आणि पोर्टस या दोन्ही खात्याचा मंत्री असून सागरी पर्यटनास लागणारी सर्व ती साधनसुविधा देण्यास तयार आहे. कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सीआयआय या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॉटिकल टुरिझम म्हणजे सागरी पर्यटनासंबंधी परिषदेचे उद्दिष्ठ नियंत्रक हेमंत आरोंदेकर यांनी पटवून दिले.
सागरी पर्यटन आणि सी फेरर क्षेत्रात गोव्यातील 3 हजार युवक विदेशात कामाला आहेत. या क्षेत्रात गोव्यात रोजगार संधी उपलब्ध करून देता येतात. नदीच्या किनारी रेस्टॉरंट व हॉटेल व्यवस्था हवी. दोनापावला जेटीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शॉपिंग सेंटर हवे, शिपिंग दुरुस्ती सेंटर हवे, असे सांगताना बोटींची पार्किंग व्यवस्था आवश्यक आहे. खाण व्यवसायामुळे बंद पडलेल्या जेटी आता सागरी पर्यटनास वापरण्यास द्याव्या, असे ते म्हणाले.
यावेळी ताज हॉटेलचे सरव्यवस्थापक व्हिन्सेन्ट रामोस, न्यू ईरा शिपिंगचे व्यवस्थापकीय संचालक अतूल जाधव, इनलेंड वॉटरवेज ऍथोरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जयंत सिंग व गोवा राज्याचे पर्यटन सचिव जे अशोक कुमार यांचे मार्गर्शन लाभले.
मरिना प्रकल्प कुठे पोहचला
मरिना प्रकल्पासंबंधीचा करार होऊन 10 वर्षे उलटली तरी हा प्रकल्प होत नसल्याने शुक्रवारी दोनापावला येथे झालेल्या या परिसंवादात चिंता व्यक्त करण्यात आली. गोव्याच्या विकासाला पुरक असा हितकारी प्रकल्प असूनही त्याचे राजकारण केले जात असल्याने तज्ञांनी चिंता व्यक्त केली.
सागरी पर्यटनामुळे होणारे लाभ महसूल आणि रोजगार या विषयावर झालेल्या परिसंवादात अत्रेय इंजिनियरिंगचे प्रमुख अत्रेय सावंत, दृष्टी लाईफ सेव्हिंगचे जी रवी शंकर, चॅम्पियन येच क्लबचे संचालक (विक्री) सुनिल धनपाल, फन क्रूझच्या संस्थापक प्रिया गुप्ता यांनी भाग घेतला.
शिपिंग हब डेस्टीनेशन
गोव्याला शिपिंग हब म्हणून जाहीर करण्याची मागणी दुसऱया परिसंवावेळी झाली. त्यात मोडरेटर म्हणून एन्थनी गासकेल यांनी जबाबदारी सांभाळली तर कॅप्टन नितीन धोंड, जेरोम क्लेमेन्त, तमल रॉय, कॅप्टन ऑफ पोर्टस जेम्स ब्रागांझा यांनी सहभाग घेतला. वॉटरवेज लेजर टुरिझम प्रा. लि. चे सीईओ जुएम बायलोम यांनी मुंबई येथून ऑनलाईन सहभाग घेऊन विषय मांडला.
देशसेवेसाठी आपण सदैव तत्पर : नितीन धोंड
कोविडच्या काळात आंग्रिया जहाज विदेशातील भारतीयांच्या मदतीला धावली व देशसेवेसाठी आपण सदैव तत्पर असेन असे कॅप्टन नितीन धोंड यांनी जाहीर केले. सागरी पर्यटन व्यवसाय परवडण्यासारखा करण्यासाठी सरकारने देशी पर्यटन जहाज आणि विदेशी जहाजांना एका मापात तोलू नये, देशी जहाजांना सुट द्यावी, असे ते म्हणाले.
आपल्या जहाजाला लागणारे इंधन गोव्यात उपलब्ध नाही. ते आणायचे असेल तर टँकरद्वारे मुंबईहून आणावे लागते. मात्र त्यासाठी परवानगी मिळत नाही. आता तर इंधनाच्या किमती दुप्पट झाल्या. सरकारच्या मदतीशिवाय या व्यवहारात तरणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
समुद्रात असताना राज्याचे की केंद्र सरकारचे नियम लागू होतात यावर दुमत असू नये, असे सांगताना नियमावली तयार करण्याची याचना त्यांनी केली. जहजावरील व्यवसाय पावसाळय़ात बंद असतो. त्यामुळे जून ते सप्टेंबर पर्यंत मान्सूनमध्ये बंद ठेवावी लागतात. आतातर ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाळा संपत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
प्रत्येकांनी आपपल्या अडचणी व त्यावरील उपाययोजना मांडल्या. उद्घाटनप्रसंगी किरीट मगनलाल यांनी बाजू मांडली व त्यांनीच आभार मानले.