खासदार सुनील तटकरे यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाबरोबर कोकणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सागरी महामार्गाचे कामाला चालना देण्यात येणार असल्याचे रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या काही कालावधीतच हे काम सुरू होईलच. परंतु मुंबई कोकणच्या जवळ यावी, यासाठी वळणविरहीत मुंबई कोकण ग्रीन एक्सप्रेस वे करण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन बुधवारी रत्नागिरी जिल्हागधिकारी कार्यालयात केले होते. त्या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे रत्नागिरीत आले होते. त्या दरम्यान येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत बोलताना सांगितले की, या महामार्गाच्या कामासह कोकणवासीयांसाठी टोलमुक्त प्रवास असावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. तसेच कोकणातील प्रमुख बंदरांच्या विकासासाठी आवश्यक 650 कोटी रुपये सागरमाला या योजनेंतर्गत दिले जावेत, यासाठी नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही सांगितले.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात खासदार तटकरे यांनी टीका केली. सरकारने कृषी, कामगार क्षेत्राला देशोधडीला लावणारे कायदे केले आहेत. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सलग 6 महिने लाखो शेतकरी आंदोलन करत असून अद्यापही केंद्राने त्याची दखल घेतलेली नाही. आंदोलकांनी उचलेले पाऊल योग्य नसले तरीही मूळ मुद्दा कायम असल्याने सरकारने वेळीच हस्तक्षेप करणे आवश्यक होते. मात्र केंद्र सरकार शेतकऱयांविषयी गंभीर नाही. पण महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामगिरीविषयी समाधानाची बाब तटकरे यांनी व्यक्त केली. कोरोना महामारीत राज्याची अर्थव्यवस्था ठप्प होऊन करवसुली थांबली. त्यामुळे उपलब्ध निधी सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी वापरला. राज्यावर संकटे आलेली असताना केंद्र सरकारने जाणीवपूर्वक जीएसटीचा निधी राज्य सरकारला दिलेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. त्यानंतर काही कालावधीतच कोरोनाची महामारी, निसर्ग चक्रीवादळ अशी अनेक संकटे राज्यावर आली. अशाही स्थितीत राज्य सरकारने कोकणाला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आवर्जून उल्लेख पत्रकार परिषदेत तटकरे यांनी केला. येथील सागरी महामार्गाबरोबरच सिंधुदुर्ग, रायगडसाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. तसेच मच्छीमारांसाठी बंदरे, पायाभूत सुविधा महाविकास आघाडी सरकारने उपलब्ध करून दिल्याचे तटकरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, बशीर मुर्तूझा, अजय बिरवटकर, सुदेश मयेकर उपस्थित होते.
..तर रिफायनरी समर्थकांची खासदार पवारांची भेट घडवूः तटकरे
नाणार रिफायनरीबाबत स्थानिक समर्थकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भेटायचे असेल तर आपण भेट घडवून आणू शकतो. मुख्यमंत्र्यांशी शरद पवार रिफायनरीबाबत बोलू शकतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी या प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. मात्र प्रकल्पाच्या फेरविचाराबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.