प्रतिनिधी / देवगड:
गुजरात व महाराष्ट्र राज्याची संयुक्त असलेली ‘एसकेयू महाराष्ट्र ऍण्ड गुजरात’ ही सागरी सुरक्षा कवच मोहीम तीन दिवस सुरू आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी रत्नागिरीहून सागरीमार्गे आलेली रेड टिम देवगड तारामुंबरी येथे सागरी सुरक्षा कवच भेदून प्रवेश करण्यापूर्वीच देवगडच्या सुरक्षा यंत्रणेने रेड टिमला रंगेहाथ पकडून आयडीबॉम्ब ताब्यात घेतला. त्यामुळे देवगड बरोबरच सिंधुदुर्गची सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे सिद्ध झाले आहे. अजून या मोहिमेचे दोन दिवस शिल्लक असून सुमारे 89 अधिकारी व कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत.
बुधवारी सकाळी 7.45 ते 9.45 वा. दरम्यान देवगड तारामुंबरी समुद्रात संशयास्पद बोट किनारी येत असल्याचे लक्षात येताच देवगड सागरी सुरक्षा कवचच्या पंचगंगा या स्पीड बोटीच्या माध्यमातून या बोटीचा पाठलाग करून तिला ताब्यात घेतले. या बोटीवर सागरी सुरक्षा कवच मोहिमेतील रेडटीमचे पाच प्रतिनिधींसोबत पाच खलाशी होते. पकडण्यात आलेल्या या बोटीमधील रेडटीमकडून आयडीबॉम्ब हस्तगत करण्यात आले. या रेडटीममध्ये नेव्ही, कोस्टगार्ड प्रत्येकी एक व पोलिसांचे तीन प्रतिनिधी होते. या रेडटिमकडे चार आयडी बॉम्ब हस्तगत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक देठे, सागरी सुरक्षा मोहिमेचे पोलीस उपनिरीक्षक तेली, साळुंखे व सागरी सुरक्षा पोलीस उपस्थित होते. ही रेडटिम देवगड येथील सुरक्षा कवच भेदून संवेदनशील ठिकाणी आयडीबॉम्ब ठेवण्याच्या तयारीत होती. मात्र, सागरी सुरक्षा कवचने त्यांना किनाऱयावर येण्यापूर्वीच ताब्यात घेतले.
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक बगळे म्हणाले, महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्याच्या सागरी सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी ही संयुक्त तीन दिवसांची सागरी सुरक्षा कवच मोहीम आहे. या मोहिमेसाठी देवगडमध्ये 18 पॉईंटवर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पाच अधिकारी तैनात ठेवण्यात आले आहेत. 35 कर्मचारी, आठ पोलीस पाटील, 26 सागरसुरक्षा रक्षक तर 15 सागरी वॉर्डन आहेत. याशिवाय खाकशी व शिरगाव येथे नाकाबंदी असून कुणकेश्वर येथे वॉचपाईंट ठेवण्यात आलेला आहे. या मोहिमेत 89 अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. अजून दोन दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.