ऑनलाईन टीम / कोलंबो
भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील सागरी सुरक्षेबाबत त्रिपक्षीय चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आज कोलंबोत दाखल झाले आहेत. श्रीलंकेत आज आणि उद्या (दि.28) भारत आणि मालदीवच्या सागरी सुरक्षा सहकार्याबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चौथी त्रिपक्षीय बैठक होत आहे.
तिन्ही देशातील सागरी सुरक्षेबाबतची ही बैठक सहा वर्षानंतर होत आहे. या बैठकीत भारताचे अजित डोवाल आणि मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया दीदी या आपल्या देशांचे नेतृत्व करणार आहेत. बांग्लादेश, मॉरिशस आणि सेशेल्सचे निरीक्षकही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
हिंदी महासागर प्रदेशातील सागरी सुरक्षेबाबत समन्वयाने कारवाई, मदत आणि बचाव कार्याचे प्रशिक्षण, समुद्रातील वाढते प्रदूषण, माहितीची देवाणघेवाण, अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी यांसारख्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल.