वार्ताहर / देवराष्ट्रे
स्व. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याची ऊच्चस्तरीय समितीमार्फत लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहीती आ.अरुण लाड यांनी दिली. आ.लाड यांनी सागरेश्वर अभयारण्यासह कडेगाव-पलुस प्रादेशिक वनविभागातील विविध प्रश्नासंर्दभात अधिवेशनादरम्याण प्रश्न ऊपस्थित केला होता.
यावेळी बोलताना आ.अरुण लाड म्हणाले, सागरेश्वर अभयारण्य हे राज्यातील पहिले आणि एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे. पलूस, कडेगाव आणि वाळवा तालुक्यांच्या सीमांवर १०.८७ चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेले हे अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि वृक्षमित्र धो. म. मोहिते यांच्या पुढाकारातून १९८५ मध्ये हे अभयारण्य आकाराला आले. या ठिकाणी हरीण, सांबर, चितळ, काळविट, ससा, कोल्हे, लांडगे, तरस, रानडुक्कर आदी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु अभयारण्यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. अधिकार्याचेही दुर्लक्ष आहे. आज अभयारण्यातील प्राणी खाद्याच्या शोधात बाहेर पडुन परिसरातील शेतीचे मोठे नुकसान करत आहेत.
हातातोडांशी आलेली पिके वन्यप्राणी खाऊन फस्त करत आहेत.
त्यामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अभयारण्याबाहेर असलेले अनेक वन्यप्राणी मोकाट जनावरांच्या हल्यात बळी पडत आहेत. यासाठी प्राण्यांचे अभयारण्यातच खाद्य निर्माण केले पाहीजे. अभयारण्यातील वनसंपदाही नष्ट होत आहे. वृक्ष नामशेष होत आहेत. कुंपनाची दुरावस्था झाली आहे. याकडे संबंधित अधिकार्याचे दुर्लक्ष आहे. याबाबत आपण अधिवेशनात प्रश्न ऊपस्थित केला होता. त्यामुळे या प्रकरणी लवकरच ऊच्च स्तरीय समितीमार्फत चौकशी होणार असुन याबाबतीत ठोस पाऊले ऊचलली जातील.