वार्ताहर /नंदगड
सागरे ग्रामस्थांकडून तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यानंतर सागरे व दोड्डेबैल लक्ष्मी यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे सागरे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
17 वर्षानंतर सागरे येथे लक्ष्मी देवीची यात्रा होणार असून यात्रा काळात भाविक मोठय़ा संख्येने येणार आहेत. मात्र गावाला बससेवा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता यात्रा काळात बससेवा पुरवावी, अशी मागणी सागरे ग्रामस्थांनी व युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांकडे वारंवार केली होती. त्यानुसार बससेवा सुरू करण्यात आली. त्याबद्दल सागरे ग्रामस्थांच्यावतीने आगार व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केवळ यात्राकाळात बससेवा सुरू न ठेवता दररोज बस सोडावी, अशी मागणी केली. यावेळी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर बससेवा कायम ठेवली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. खानापूर, नंदगड, कसबा नंदगड, सागरे ते बिडी असा बसचा मार्ग असणार आहे. तसेच यात्राकाळात बसच्या तीन फेऱया असणार आहेत. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.