प्रतिनिधी / साटेली भेडशी:
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कामकाजामुळे साटेली-भेडशी बाजारपेठेतील मुख्य राज्यमार्गावरील गटारांची साफसफाई न केल्याने पहिल्याच पावसात मोठय़ा प्रमाणावर केरकचरा रस्त्यावर आला असून वाहतुकीसह चालणेही अवघड बनले आहे.
साटेली भेडशी ग्रामपंचायत हद्दीतून दोडामार्ग तिलारी हा राज्यमार्ग जातो. याच मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बाजारपेठ वसलेली आहे तर अनेक राहती घरेही रस्त्यालगत आहे. साटेली भेडशी ग्रामपंचायतींनी रस्ते, गटार यांची साफसफाई, दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधले होते. मात्र, प्रत्यक्षात पावसाळय़ाला सुरुवात झाली तरी सार्वजनिक विभाग जागा झाला नाही. यामुळे आता दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसात मोठय़ा प्रमाणात केरकचरा वाहत रस्त्यावर आला आहे. तर गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे रस्त्यावरून चालणेही अवघड बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून मधला बाजार ते खालचा बाजार गटार कॉंक्रिटिकरणचे काम मंजूर असून या कामाला ठेकेदारही नेमला आहे. हे कामही पूर्ण न झाल्याने कामास दिरंगाई करणाऱया ठेकेदारावर बांधकाम विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सरपंच लखू खरवत यांनी केली आहे. याबाबत आठवडाभरात कार्यवाही न केल्यास सर्व सदस्यांसह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.